ऑनलाइन टीम / पुणे :
तब्बल ५०० किलो फळे आणि भाज्यांची आरास…टरबूज आणि फळांवर कोरलेली देवतांची प्रतिमा…गाजर, भोपळा, टोमॅटो, पालक आणि मटारने केलेली आकर्षक सजावट… अशी विविधरंगी फ ळे आणि भाज्यांची आरास दत्तमंदिरामध्ये करण्यात आली आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे तब्बल ५०० किलो भाज्यांचा वापर करुन ही आरास साकारण्यात आली.
अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, याकरीता ही आरास करण्यात आली. यामधील फळे आणि भाज्या अनाथ मुलांच्या संस्थेला देण्यात येणार आहे. दोन दिवस ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली आहे.