प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसली तरी यामुळे महामार्गावरील वाहतूक साडेतीन तास बंद होती. त्यामुळे काही वाहने चिरणीमार्गे वळवण्यात आली. रात्रीच जेसीबी व लोडरने ही दरड बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र आणखी दरड कोसळण्याची भीती असल्याने येथे जागता पहारा ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षापासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी परशुराम घाटातील रूंदीकरण करताना डोंगर कापून मोठय़ा प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. यामुळे दरड कोसळल्यास पेढे गावातील ग्रामस्थांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी मोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे, तर परशुराम गावाच्या बाजूने डोंगर कापताना 3 टप्पे करण्यात आले आहेत. तरीही दरड कोसळल्यास ती तत्काळ बाजूला करता यावी, यासाठी महामार्ग उपविभाग व ठेकेदार कंपन्यांकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ईगल इन्फ्रा कंपनीने पोकलेन, जेसीबीसह 6 कामगार तर कल्याण टोलवेज कंपनीनेही यंत्रसामुग्रीसह मनुष्यबळ तैनात केले आहे. दर 2 तासांनी तैनात टीम घाटाची पाहणी करत आहेत.
तरीही शनिवारी रात्री 11 वाजता दरड कोसळून ती थेट महामार्गावर आली. सुदैवाने या दरम्यान एकही वाहन आले नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, तहसील कार्यालयाचे प्रसन्न पेठे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर 1 जेसीबी व एका लोडरने साडेतीन तास काम करून ही दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर पाणी मारून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वाहनचालकांनी अधिक दक्ष रहावे!
दरड कोसळल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अगदी जवळ आलेली वाहने माघारी फिरवणे शक्य नव्हते. त्यानंतर काही वाहने चिरणीमार्गे वळवण्यात आली. त्यामुळे त्या मार्गावरही वाहनांची गर्दी झाली होती. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी दरड कोसळण्याचा धोका असल्याने यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी अधिक दक्ष रहावे, असे आवाहन अधिकाऱयांनी केले आहे.