शिवानीला जेव्हा आई होणार हे कळले तेव्हा ती हरखून गेली. उदरामध्ये इवलासा अंकुर उमलताच तिच्या देहात-मनात अनेक बदल घडले. ती भेटली तेव्हा तिला विचारले, ‘जन्माला येणाऱया बाळाबद्दल काय वाटतं तुला?’ ती चटकन म्हणाली, ‘हे बाळ आम्हा दोघा पती-पत्नीचं, कुटुंबाचं आणि घराण्याचं भविष्य आहे.’ पुन्हा विचारले, ‘खरंच हे बाळ तुझं आहे?’ ती म्हणाली, ‘अर्थात. मी जन्म देणार त्याला. माझंच आहे ते.’ नंतर तिला म्हटले, ‘अगं, आईवडिलांची एकएक पेशी घेऊन जन्मणाऱया ह्या बाळाचे अवयव तू तयार करते आहेस का? अगणित तंतू असलेला मेंदू, अखंड चालणारे ह्रदय, पचन करणारे पोट, बघणारे डोळे, ऐकणारे कान, श्वास घेणारे नाक… तू काय काय बनवते आहेस? सांग तरी..’ या प्रश्नावर अंतर्मुख होऊन ती म्हणाली, ‘मी फक्त बाळाचे पोषण नीट व्हावे म्हणून पौष्टिक अन्न सेवन करते आहे. कणाकणाने क्षणोक्षणी त्याला घडवणारा कोण आहे माझ्या देहात ते तरी सांग..’
संत कबीर म्हणतात, ‘झीनी झीनी बिनी चदरिया..’ अंतरातल्या आत्म्याने हळूहळू देहाची चादर विणली आहे. आपले शरीर ही परमेश्वराची अपूर्व निर्मिती आहे. प्रत्येक व्यक्ती चेहरा, अवयव निरनिराळे असलेली आहे. कुठेही कुणाचीही नक्कल नाही. हे सृजन करताना त्या परमेश्वराला दहा महिने लागले. ‘साई को सीयत मास दस लागे, ठोक ठोककर बिनी चदरिया’. परमात्म्याने दहा महिने दिवस-रात्र कष्ट केले तेव्हा हे सुंदर शरीर निर्माण झाले. या मूल्यवान निर्मितीवर फक्त त्या परमेश्वराची सत्ता आहे. विदूषी विमलाताई ठकार असे म्हणतात, ‘स्त्रियांनी एवढेच फक्त लक्षात ठेवावे की मुलाला जन्म दिला खरा, पालन-पोषणही केलं, पण मी काही त्याची मालक नाही. माझ्या शरीराची जिथे मी मालक नाही तिथे मुलाची तरी मालक मी कशी असेन? आपण मुलांचे मालक नसून केवळ विश्वस्त (ट्रस्टी) आहोत. परमेश्वराने निर्माण केलेला मुलगा नियतीने, गतीने जसा फुलायचा तसा फुलेल. मी फक्त त्याचा सांभाळ करेन. त्यावर सत्ता सांगणार नाही.’ माझेपणाचा हट्ट हा अहंकार आहे हे कळले की अंतरीचा ज्ञानदीप हळूहळू प्रकाशमान होतो आणि त्या परमेश्वराची सत्ता अनुभवाला येते.
एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराज श्रीकृष्णाचे मनोगत सांगताना म्हणतात, ‘गोकुळामधल्या गोपिका शरीर, मन प्राणाने माझ्यावर भाळल्याने आत्मसुख पावल्या, मात्र ज्यांना कर्माचा अभिमान होता ते माझ्यापर्यंत पोचले नाहीत. एका स्त्रीचा नवरा शास्त्राभिमानामुळे आपल्या पत्नीला माझ्याजवळ येऊ देईना. तो म्हणायचा, तुम्ही त्या गवळय़ाची पूजा का करता? त्याची स्त्री माझ्यासाठी तळमळू लागली तेव्हा तो तिला म्हणाला, तुझ्या पित्याने तुझा हात माझ्या हाती दिला तेव्हापासून तुझ्या देहावर माझी सत्ता आहे. मला सोडून तुला जाता येणार नाही. तेव्हा ती म्हणाली, फक्त या देहाचा तू पती आहेस ना? तेव्हा ती देह त्याच्यापाशी ठेवून प्राणाने मला येऊन मिळाली आणि सायुज्य मुक्तीला गेली. संत तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई यांचा विवाह वयाच्या तिसऱया वषी बिजवर असलेल्या कोपिष्ट माणसाशी झाला तेव्हा त्याचे वय तीस वर्षाचे होते. जन्मजात वैराग्य असलेल्या बहिणाबाईंना जीवनात संघर्ष करावा लागला. त्या म्हणतात, ‘स्त्रियेचे शरीर पराधीन देह । न चाले उपाव विरक्तीचा ।।’ पतीसमोर त्यांना ब्र काढण्याची सोय नव्हती. पतीचा मार, अत्याचार सोसून त्या ठाम निश्चयाने म्हणतात, ‘गांजविसी देह भ्रताराच्या हाते । माझीया तो चित्ते नेम केला। न सोडी भजन प्राणही गेलिया। आता देवराया दीनबंधो।।’ संत तुकाराम महाराजांचा त्यांना ध्यास लागला आणि देह जरी प्रपंचाचा असला तरी त्यांनी चित्त सद्गुरूंजवळ ठेवून दिले आणि पुढे सद्गुरूंची सत्ता त्यांच्या अनुभवास आली. त्यांचे पती शांत स्वभावाचे होऊन संत तुकाराम महाराजांना शरण गेले. भागवत मंदिरावरील ध्वजा म्हणजे संत बहिणाबाई होत.
संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीविण । देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ।।’ व्यवहारामध्ये असे दिसते की मरणासन्न असलेली व्यक्ती वर्षानुवर्षे अंथरुणावर पडून असते. तो परमेश्वर कधी उचलून नेईल याची वाट बघत असते आणि कसलेही व्यसन नसलेली निरोगी व्यक्ती चालताबोलता अचानक देवाघरी जाते. माणसाचे शरीर, आरोग्य, अस्तित्व हे सारे त्या परमेश्वरी कृपेवर चालत असते. माणसाला स्वतःच्या देहाचा, निरोगी असण्याचा वृथा अहंकार असतो. संत तुकोबा म्हणतात, ‘वृक्षाचेही पान, हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे?’ साधे झाडाचे पान आपल्या सामर्थ्याने हलत नाही, तर ती परमेश्वराची सत्ता असते. ‘देह हे देवाचे, धन कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे?’ असा प्रश्न महाराज विचारतात. त्याची सर्वत्र सत्ता आहे. देता-देता काढून घेणे हीसुद्धा त्याचीच मर्जी. संतश्रे÷ ज्ञानोबा माऊली म्हणतात, तुझे विधिनिषेध, कुळधर्म, राहणे, खाणे-पिणे याच्या ज्या काही पद्धती असतील त्या तशाच ठेव. त्यासाठी तुला परवानगी देतो. पण ‘परि मने वाचा देहे । जैसा जो व्यापारी होये । तो मी करीतु आहे । ऐसे न म्हणे ।।’ माणूस जन्माला येतो, कष्ट करतो, जगतो, मरतो हे कर्तृत्व त्याचे स्वतःचे नाही, तर विश्वातल्या प्रचंड शिस्तबद्ध शक्तीचे आहे. तू तुझ्या शक्तीने जगत नाहीस. आपण या जगामध्ये चालणारा त्याचा खेळ खेळणाऱया कळसूत्री बाहुल्या आहोत. तो कळसूत्री बाहुल्यांचा मालक सूत्र हलवतो. कुणाचा विजय, तर कोणाचा पराजय. सगळा खेळ त्याचा तो जाणो. अकर्तेपण शिकायला हवे. कार्य घडायला मी कारण नाही. हा उपदेश आहे. त्याची शक्ती कळण्यासाठी नामस्मरणाचा अभ्यासच हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश करते. एक गृहस्थ सहकुटुंब गोंदवलेत आले. त्यांना पंडुरोग होता आणि पन्नाशी उलटली तरी मूलबाळ नव्हते. पत्नी गंगाबाई यामुळे दुःखी असत. महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही इथे राहा आणि सर्वकाळ रामाचे नाव घ्या. राम काय करतो ते बघू. नंतर ते दोघे पती-पत्नी जप आणि सेवा करू लागले. यथावकाश त्यांना मुलगा झाला; परंतु त्याचे पाय वाकडे होते. महाराज म्हणाले, दुरिताचा शेष अजून राहिला आहे. नेमून दिलेला जप कराल तर राम हे सुद्धा नाहीसे करील. त्यांच्या मुलाचे पाय हळूहळू सरळ झाले तेव्हा महाराज म्हणाले, ‘बघा, नामाची सत्ता ही अशी असते. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामामुळे प्रत्यक्ष भगवंत घरी येतो, तेव्हा त्याला पैसा, लौकिक, संतती जर आपण मागितली तर ते दुःखाला कारण होते.’ सद्गुरूंची सत्ता ही संपूर्ण विश्वावर असते हे ज्याला कळले तो या कामधेनूद्वारे मोक्षाच्या द्वारी जाऊन पोचतो. नाम देणे, नाम घेणे हीसुद्धा सद्गुरूंची सत्ता. म्हणूनच तर संत म्हणतात ना, ‘तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्वकाळ’. प्रार्थना करीत हात जोडले की त्याच्या सत्तेच्या कक्षेत आपला सहज प्रवेश होतो हे निश्चित.
-स्नेहा शिनखेडे