महामार्गसह स्थानिक प्रशासन यांच्यात चर्चा
चिपळूण
गेल्या 9 दिवसांपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट 13 जुलैपासून दिवसातून काही काळ वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता. दरम्यान, कोसळत असलेल्या पावसात स्वयंदेव राधानगरमधील डोंगराला यावेळीही भेगा गेल्याने तेथील 49 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. येथे एनडीआरफच्या पथकाने पाहणी केली, तर कोळकेवाडी येथेही घरालगतचा दगडाचा बांध सोमवारी रात्री कोसळल्याने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात सोमवारी सरासरी 93 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसातच सोमवारी राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी परिसरात डोंगर उतारावर जमिनीला भेगा पडल्या आहेत. गतवर्षीही अशाचप्रकारच्या भेगा गेल्या होत्या. मंगळवारी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यासह अधिकाऱयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर राधानगरमधील 40 लोकसंख्या असलेल्या 10 कुटुंबांना स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत, राध्ग्नाानगर-अंगणवाडी इमारतीसह गावातील इतर सुरक्षित घरांमध्ये या कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले तर धनगरवाडीतील एका कुटुंबातील 8जणांना तेथील जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले आहे.
स्वयंदेव येथील 19 कुटुंबे जवळच्या घरांमध्ये सुरक्षित ठिकाणी राहण्यास गेली आहेत. येथे दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकाने भेगा पडलेल्या डोंगर परिसराची पाहणी केली. यावेळी तलाठी नंदगवळी व ग्रामसेवक हांगे तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात जागृती करण्यात येत आहे. कोळकेवाडी हसरेवाडी येथील तुकाराम बंगाल यांच्या घरालगत असलेला मातीचा बांध रात्रीच्या सुमारास कोसळल्याने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. हसरेवाडी, तांबडवाडी, बोलाडवाडी, बौध्दवाडी, पश्चिम हसरेवाडी. या वाडय़ा कोयना प्रकल्पाने पुनर्वसित केल्या आहेत. या वाडय़ा भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात वसल्या आहेत. कोळकेवाडी धरणाच्या दुतर्फा असलेल्या या वाडय़ांना कायम दरड कोसळण्याचा धोका आहे. ही बाब पुनर्वसन जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभाग रत्नागिरी यांच्याकडे वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकरणी गांभीर्याने लक्ष न दिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहिल, असा इशारा माजी सरपंच नीलेश कदम यांनी दिला आहे.
गेल्या सोमवारपासून वाहतुकीस बंद असलेला परशुराम घाट बंद असल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यातूनच अडकून पडलेल्या वाहनांसाठी मंगळवारी सायंकाळनंतर घाट सुरू ठेवण्याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान घाट बंदची मुदत मध्यरांत्री संपत असल्याने बुधवारपासून दिवसातील काही तास वाहतूक सुरू ठेवण्याबाबत महामार्ग पेण विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यत त्यावर अंतिम निर्णय झाला नव्हता.