कास / वार्ताहर :
विकेंडसाठी जवळचे ठिकाण म्हणून सातारकर कास पठार परिसराला प्राधान्य देतात. मान्सूनच्या आगमनाने कास परिसराला सौंदर्याची अनोखी झालर लाभली आहे. त्यामुळे सर्वांनाच कासचे वेध लागले असतानाच सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर घाटात सांबरवाडीजवळ ठिय्या मांडला आहे. अनेकांना पोलिसांनी येथूनच माघारी धाडल्याने हिरमोड झालेल्या पर्यटकांना व सातारकरांना घरचा रस्ता धरावा लागला.
जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार, कास तलाव यांच्या बरोबरीने मान्सूनच्या दमदार आगमनाने धो-धो कोसळत असलेला भारतातील सर्वात उंच वजराई भांबवली धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. कास पठारावर फुले उमलायला अद्याप वेळ असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात धबधबा भेटीसाठी पर्यटक गर्दी करतात. गर्द दाट धुके, अधूनमधून कोसळणारा पाऊस आणि हिरवाईने नटलेला परिसर अशा सुंदर वातावरणासाठी लोकांना कास परिसराचे आकर्षण असते. पण विकेंड लाॅकडाऊनमुळे पोलिसानी या परिसरात येणाऱ्यांना अटकाव केल्याने या निसर्गरम्य पर्यटनापासून सातारकरांना वंचित राहावे लागत आहे.
कोरोना संकटामुळे गतवर्षी कास पठार चा पुष्प हंगाम सुरू केला नव्हता. नुकतेच शासनाने अनलाॅकचे केल्याने लोकांना थोड्या प्रमाणात का होईना घराबाहेर पडता येत आहे. अनेक दिवसांपासून घरात बंदीस्त असलेल्या लोकांना थोडंफार निसर्गात फिरण्याची ईच्छा असताना ही पोलिसांच्या अटकावामुळे लोकांना जवळपास असणार्या या स्थळांच्या भेटीपासू्न वंचित राहाव लागत आहे.पोलिसांचा अटकाव हा विकेंड लाॅकडाऊन पुरता मर्यादित नाही. सोमवार ते शुक्रवार नियमात शिथीलता असतानाही पोलीस पर्यटकांना अटकाव करत असल्याने लोकांमध्ये नाराजी पसरत आहे.
या निर्बंधाचा फटका मात्र या रस्त्यावर अवलंबून असलेल्या कास, बामणोली भागातील शेकडो स्थानिक लोकांना बसत असून, कामानिमित्त सातारा शहरात येणारे विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात अडकत आहेत.