वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा थेट आरोप : टॅक्सीवाल्यांचा संप पूर्णतः बेकायदेशीर,‘एस्मा’ अंतर्गत करणार कारवाई
प्रतिनिधी / पणजी
पर्यटक टॅक्सीचालक व मालकांनी केलेला संप बेकायदेशीर असून त्यांना संपावर जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांची सेवा ‘एस्मा’ (अत्यावश्यक सेवा) अंतर्गत येत असून कारवाई करण्याचा इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे. ‘गोवा माईल्स’ ऍपचे कारण पुढे करून ते डिजिटल मीटर बसविण्यास विरोध करत असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यटकांकडून ते वाटेल तसे पैसे उकळता, त्यामुळे गोवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही बदनाम होत आहे, असेही ते म्हणाले.
नवीन मोटार वाहन कायदा सरकारने स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याची कार्यवाही आता होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्यांनी देखील त्या कायद्यावर तसाच स्थगित करण्याचा अभिप्राय दिला असून आता केंद्र सरकार काय करते ते बघुया, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
गोवा माईल्सही नको, मीटरही नको
पर्वरी येथे मंत्रालयात काल शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पर्यटक टॅक्सीवाल्यांचा संप निरर्थक आहे. गोवा माईल्स रद्द करण्याची अट ते घालतात, तेच मुळात चुकीचे आहे. त्यांना मीटर नको, एक-दोन भाडी मारली आणि पर्यटकांकडून वाटेल तसे पैसे उकळले की, त्यांचे काम झाले. अशा प्रकारामुळे गोव्याचे पर्यटन बदनाम होत आहेत. गोवा माईल्सची सेवा त्यांच्या तुलनेत स्वस्त असल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवा माईल्स रद्दची मागणी चुकीची
पर्यटक टॅक्सीवाल्यांचे जर काही प्रश्न असतील तर चर्चा करण्याची तयारी मंत्री गुदिन्हो यांनी दर्शविली असून चर्चेतून ते प्रश्न सोडविता येतील. तेव्हा चर्चेला या. वाहतूक संचालकाकडे वेळ ठरवा आणि संप मागे घ्या, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले. ‘गोवा माईल्स’ रद्द करा, ही त्यांची मागणीच चुकीची असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
पर्यटन व्यवसायाची बदनामी नको!
दाबोळी विमानतळावर गोवा माईल्सला स्टॉलची अनुमती मिळणार नाही, कारण ऍप सेवेला स्टॉल नसतो. तेथील काऊंटर पर्यटन खाते लवकरच वाहतूक खात्याच्या ताब्यात देणार असून त्या विमानतळाची रु. 1.54 कोटी थकबाकी पर्यटन खाते व टॅक्सी युनियन भरणार असल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली. टॅक्सीवाल्यांनी गोव्यातील पर्यटन व्यवसाय बदनाम करू नये. त्यांच्या मागण्यांवर सरकार विचार करेल, परंतु त्यांनी अटी घालू नयेत, असेही त्यांनी सांगितले.
मीटर बसवणे सर्वांच्या हिताचे
उच्च न्यायालयानेच टुरिस्ट टॅक्सीला मीटर लावण्याचे निर्देश दिले असून त्यानुसारच भाडे आकारण्यास सांगितले आहे. इतर राज्यातील टॅक्सींना मीटर असतात व मीटरप्रमाणेच भाडे आकारण्यात येते. गोव्यातील टॅक्सींना मात्र मीटर नाहीत. हा प्रकार अयोग्य असून मीटर बसवणे से सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे पर्यटकांची लुटमार होणार नाही आणि ती थांबेल म्हणून टॅक्सीवाल्यांना आता मीटर बसवावेच लागतील, असे निवेदन मंत्री गुदिन्हो यांनी केले.
फोंडा-पणजी व मडगाव-काणकोण या दोन मार्गावरील खासगी बसगाडय़ा, कदंब परिवहन महामंडळ ताब्यात घेऊन चालवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
वेळप्रसंगी रस्ते, पूलही रोखू
सरकार टॅक्सीवाल्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला टाळाटाळ करीत आहे. आमची महत्वाची मागणी म्हणजे गोवा माईल्स रद्द करा. अन्यथा आंदोलन उग्र होणार असून गरज पडल्यास रस्ता रोखो, पूल रोखो करायलाही मागे राहणार नाही, अशी धमकी टॅक्सीमालकांनी सरकारला दिली आहे.
जे टॅक्सी व्यवसाय करतात ते गोमंतकीय आहेत. त्यांच्या पोटावर पाय ठेऊन गोवा माईल्सच्या नावाखाली परप्रांतीयांचे सरकार चोचले पुरवीत आहे. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा त्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊ, असा इशाराही टॅक्सी मालकांनी दिला आहे.
टॅक्सी मालक संघटनेने येथील आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. काल शुक्रवारी दुसऱया दिवशीही आंदोलन सुरुच होते. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी टॅक्सीमालकांना आज 10 एप्रिलपर्यंत परवाना असल्याने आजच शेवटचा दिवस ठरणार आहे.
… तर सरकार जबाबदार राहील
बाप्पा कोरगावकर म्हणाले की मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरु रहाणार आहे. जोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे तो पर्यंत ते शांततेत असणार, मात्र आझाद मैदानावरून बाहेर पडल्यानंतर पुढे काय होईल ते आपण सांगू शकत नाही. मात्र जे काही होईल, त्याला सरकार जबाबदार असणार असल्याचेही कोरगावकर यांनी सांगितले. सरकारला आम्ही एका महिन्याचा अवधी दिला होता. सरकारने आमच्या मागणीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आम्ही हा पर्याय निवडला. आमचा व्यवसाय वाचविण्यासाठी आमची ही धडपड आहे. आत्तापर्यंत आम्ही शांततेने लढा देत आहोत. परंतु आमची सहनशक्ती संपली की आम्ही कुठलाही पर्याय स्वीकारु शकतो असेही ते म्हणाले.
काल या आंदोलकांनी आझाद मैदानावर फेऱया मारून घोषणबाजी केली सरकारवर टीकाही केली. काल प्रतिमा कुतीन्हो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडकर, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर तसेच अन्य काही राजकीय नेत्यानी व बिगर सरकारी संस्थांच्या पदाधिकाऱयांनी आंदोलनस्थळी भेट देऊन टॅक्सी मालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.