ऑनलाईन टीम / हृषिकेश :
एम्स ऋषिकेश येथे उपचार घेत अडलेले जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी 12 वाजता निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 86 टक्क्यांपर्यंत आली होती. परंतु, डॉक्टर त्यांची रक्तातील साखरेची पातळी आणि ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मात्र, आज त्यांचे निधन झाले.
सुंदरलाल बहुगणा हे पर्यावरणवादी असण्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकही राहिलेल आहेत. पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1927 रोजी टिहरी जिल्ह्यातील भागीरथी नदीच्या काठी वसलेल्या मारोरा गावात झाला. त्याचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीमध्ये वन अधिकारी होते. वयाच्या 13 व्या वर्षी अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्यांनी टिहरी संस्थानाविरुद्धही आंदोलन केले होते.
सुंदरलाल बहुगुणा यांनी 1972 मध्ये चिपको चळवळीला चालना दिली. त्यांनी देश आणि जगाला जंगलाचे संरक्षण करण्यास प्रेरित केले. चिपको चळवळीचा परिणाम जगभर दिसून आला होता. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असलेल्या बहुगुणा यांचे नद्या, वने आणि निसर्गाशी गहन नटे होते.
धार ऐंच डाला, बिजली बणावा खाला-खाला’ अशी त्यांची घोषणा होती. म्हणजेच, उंच-उंच ठिकाणी झाडे लावा आणि खालच्या ठिकाणांवर छोट्या प्रकल्पांतून वीज तयार करा. साध्या जीवनाची सोपी कल्पना अंगीकारत त्यांनी आयुष्यभर निसर्ग, नद्या व जंगलांच्या रक्षणासाठी मोहीम चालूच ठेवली. बहुगुणा यांनीच चांगल्या आणि वाईट वनस्पतींमध्ये फरक करायला देखील शिकवला होता.