6 जानेवारीला पुण्यात रंगणार संमेलन
पुणे / प्रतिनिधी :
14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या ‘पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे’ आयोजन येत्या 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 या वेळेत स. प. महाविद्यालयाच्या दृक्-श्राव्य हॉलमध्ये करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वन्यजीव अभ्यासक, लेखक आणि छायाचित्रकार अतुल धामणकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन अनेकविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग लक्षणीय असून, त्यांच्या पारितोषिक विजेत्या साहित्याचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा विषय ’प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा असून, संमेलनातील विविध ठराव महाविद्यालयीन युवक मांडणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते सोमवार दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यानंतर या संमेलनाचे अध्यक्ष अतुल धामणकर यांचे भाषण आणि ‘वाघ’ या विषयावर त्यांचे दृक्-श्राव्य सादरीकरण होणार आहे. दुपारी बारा वाजता विद्यार्थ्यांच्या पारितोषिकप्राप्त साहित्याचे वाचन, तर दुपारी 1.45 वाजता बारामतीचे रविंद्र कोकरे यांचे कथाकथन होणार आहे. दुपारी 2.30 वाजता पुण्याच्या अंजली कुलकर्णी आणि अहमदनगरचे संजय बोरूडे यांचा ‘निसर्ग कविता’ हा कार्यक्रम होईल.
दुपारी 3.30 वाजता जोत्स्ना प्रकाशन निर्मित डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘अंतरीच्या गर्भी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आय. पी. एस.अधिकारी अनंत ताकवले आणि जोत्स्ना प्रकाशनाचे संचालक मिलिंद परांजपे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यानंतर महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रमोद काळे यांचे असून, डॉ. संगीता बर्वे, वेदांत रानडे, प्रांजली बर्वे, हर्षद राजपाठक आणि प्रियांका बर्वे आदी कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत.