अर्जुन हा सख्यभक्तीचा आदर्श मानला जातो. आपला सखा कृष्ण याला आनंद देण्यासाठी अर्जुन त्या शत्रू सेनेवर तुटून पडला. ते कृष्णाचे वैरी त्याचा मार्ग रोधून धरत होते. अर्जुन आपले गांडीव धनुष्य सरसावून त्यांना सामोरा गेला. प्रलयातील प्रचंड वाऱयाने आकाशातील ढग जसे फुटून अस्ताव्यस्त होतात तसे अर्जुनाच्या बाणांच्या वर्षावाने शत्रू सैन्य अस्ताव्यस्त झाले. त्याच्या बाणवर्षावाला घाबरून सारे शत्रूचे सैनिक पळू लागले. जेव्हा जंगलाच्या राजाचे सिंहाचे आगमन होते, तेव्हा त्याची गर्जना ऐकून हत्तीपासून चिलटापर्यंत सर्व प्राणी भयभीत होतात तसे अर्जुनाला पाहून शत्रू सैन्याचे झाले.
भग्नवीर्य नृपांच्या थाटी । पळती समरिं देऊनि पाठी ।
यादव प्रतापी महाहठी । त्यांतें लुंठिती विजयार्थ ।
जिंकिले अश्व रथ कुंजर । कित्तेक जीत धरिले वीर ।
सामान्य पदातियांचा भार । वोझीं देऊनि चालविले ।
कित्तेक तृणें धरिती दांतीं । प्राणदाना एक मागती ।
एकीं भेदरा घेतला चित्तीं । उदो म्हणती जीवभयें ।
वस्त्रें हिरतल्या नागव्या झुंडी । वोडणाची करूनि परवडी ।
खङ्ग दिवटी उदो तोंडीं । म्हणती नव खंडीं फिरों भूतें ।
साधुनिंदा घडली मुखें । श्वान म्हणविती तया दोषें ।
भुंकभुंको नाचती सुखें । एळकोटघोषें गर्जोनी ।
प्राण वांचवावया रणीं । एक म्हणविती दिंडिगाणी ।
भस्मोद्धलनीं शंखस्फुरणीं । पाषाण मूर्धनीं एक वाहती ।
एक उताणें पदले पंथीं । नेत्रीं घालूनि अपयशमाती।
अंध पंगू म्हणविताती । मुखें गर्जती धर्म जागो ।
ऐसे असंख्य वेषधारी । प्राणरक्षणें परोपरी ।
भराडे बाळसंतोष भिकारी । बहुधा शरीरिं नट नटले ।
दीनाहूनि दीन फकीर । पोटासाठीं दारोदार ।
कंठशोषें करिती किरकिर । केंवि दुस्तर निस्तरवे ।
शौर्य हारपोनि गेलें समरिं । पुरुषार्थभंगें म्हणविती नारी ।
सौऱया नाचती देऊनि फेरी । श्मश्रु वत्रीं लाजविती।
ऐसियांतें यादववीर । सोडिती देऊनि नभीकार ।
पाखंडवेषें भरूनि उदर । लज्जित स्वपुरें प्रवेशती।
कैंची नोवरी कैंचें यश । हारविले गजरथाश्व निःशेष।
नागवे उघडे देशोदेश । पावोनि अपयश रिपु गेले।
अर्जुनाकडून पराभूत होऊन पळणाऱया त्या राजांचा यादव वीरांनी पाठलाग केला. त्यांचे घोडे, हत्ती, रथ काढून घेतले. त्यांच्या डोक्मयावर ओझी देऊन त्यांना पायी चालायला लावले. कित्येक वीर दाती तृण धरून शरण आले आणि त्यांनी जीवदान मागितले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यातील कित्येकांनी वेशांतर करून सोंग पांघरले. कोण उदे उदे म्हणत गोंधळी झाले. कोण मल्हारीचा गजर करत वाघे झाले. कोणी अंगाला राख फासून संन्यासी झाले व शंख वाजवू लागले. कोणी आंधळे तर कोणी पांगळे भिकारी झाले. पोटासाठी आम्हाला दया करून भीक घाला असा आक्रोश ते करू लागले. काही वीरांनी तर आपल्या मिशा भादरल्या आणि लुगडी नेसून त्यांनी स्त्रीवेश धारण केला आणि ते नाचू लागले.
Ad. देवदत्त परुळेकर