ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस शनिवारी साजरा झाला. कोरोनाचा काळ आहे तरीही कोरोनाचा होणारा कहर मागे सरकला आहे. या पार्श्वभूमिवर सत्कार, भाषणे, होर्डिंग्ज आणि आगामी योजना, अपेक्षा हे सगळे वाढदिवसाचे सोपस्कार झाले. पवारांना देशाचे नेतृत्व करायचे आहे. महाराष्ट्राची एकहाती सत्ता घ्यायची आहे. पण अर्धशतकाहून अधिक काळ राजकारण करून ते साधलेले नाही. पावसात भिजून त्यांनी राष्ट्रवादीचे पीक तरारून आणले व भाजपा-सेना युतीत फूट पाडून भाजपाला रोखले पण पवारांची मनीषा पूर्ण झालेली नाही. 12 डिसेंबरच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एक चाल खेळली आहे. त्यांनी आपला वाढदिवस ‘पॉवर डे’ स्वरुपात साकारताना 50 वर्षे साथ देणाऱया जनतेचे आभार मानले असले तरी अवघा महाराष्ट्र पूर्ण शक्तीने आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे असा संदेशही या निमित्ताने दिला आहे. राजकारणात प्रत्येक संधीचे सोने करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. पण असे करताना काही शत्रू अंगावर घ्यावे लागतात तर काही मित्रही साशंक होतात. शरद पवार यांची पंच्याहत्तरी झाली तेव्हा सुंदर सोहळे झाले होते. पण नंतरच्या काळात राजकारणात टोकदार टीका आणि संकेत न पाळता विरोध, कार्यक्रम सुरू झाले. राजकारणाने दर्जा सोडला अशी टीकाही झाली पण, सुधारणा झाली नाही. राजकारणाची धुणी धुणे आणि एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करणे सुरुच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला आणि वाढती बेरोजगारी, खोटी आश्वासने, मंदी यावरून वाढदिवसा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यांची परतफेड भाजपाने 12 डिसेंबरला केली आणि भ्रष्टाचार विरोधी अशी भूमिका घेत या विषयावर शरद पवारांना लक्ष्य केले आणि मोदींच्या बदनामीचा बदला घेतला. करावे तसे भरावे लागते पण राजकारणासह सर्वत्र सभ्यतेचे, समयसूचकतेचे आणि संस्काराचे भान ठेवणे आवश्यक असते. राजकारणात विरोध असू शकतो पण शत्रुत्व असू नये. पण अलीकडे त्यांचे भान सुटत चालले आहे. तथापि, वरिष्ठ पातळीवर पंतप्रधानांपासून अनेकांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. पवारांच्या या ‘पॉवर डे’ मधून कुणाला काय मेसेज मिळाले, दिले याचे तपशील हळूहळू उलगडतील पण एक मेसेज स्पष्टपणे पुढे आला आहे. शरद पवार काहीही म्हणत असले तरी त्यांना व त्यांच्या पाठीराख्यांना पवारांना देशाचे नेतृत्व करताना पहायचे आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही भावना पूर्वीही व्यक्त केली होती व पॉवर डेच्या निमित्ताने ती अधिक अणकुचीदारपणे व्यक्त करताना काँग्रेसमधील काही नेत्यांमुळे पवारांची पंतप्रधानपदाची संधी दोन वेळा हुकली. पण अवघा महाराष्ट्र 48 खासदारांसह पवारांच्या पाठीशी उभा राहिला तर ती पुन्हा मिळू शकते. ममतांच्या पाठीशी तेथील खासदार उभे राहतात. मग महाराष्ट्राचे खासदार का नाही असे सांगत पटेलांनी पवारांची आगामी वाटचाल ध्वनीत केली आहे. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राच्या 288 आमदारांनी आणि 48 खासदारांनी वज्रमूठ बांधावी व हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी अनेक वर्षे मागणी होते आहे पण ते जमलेले नाही. पवारांच्या पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्र एकवटणार का हा प्रश्न आहे. पवारांनी दोनवेळा काँग्रेस सोडली. पुलोदच्या प्रयोग केला. महाआघाडीत शिवसेनेला सामावून सत्ता मिळवली आणि केंद्रात, राज्यात सत्ता भोगली, पण हे त्यांचे स्वप्न साकारणार का आणि विरोधी पक्षाचे नेतृत्व आणि विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव स्वीकारले जाणार का हा मूळ प्रश्न आहे. पवारांना आजवर महाराष्ट्राची सत्ताही एकहाती मिळालेली नाही. दक्षिण, प. महाराष्ट्र आणि शुगर लॉबी हे त्यांचे शक्तीकेंद्र आहे. आता काँग्रेस कमकुवत होत असताना पवारांनी राज्यात काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. देशातही असा प्रयोग त्यांनी करावा आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचावे असे भाजपा विरोधकांना वाटते. त्यातूनच पवारांनी युपीएचे नेतृत्व करावे. अध्यक्षपद सांभाळावे अशी हवा वाहते आहे. सोनिया गांधी हे पद सोडणार का आणि राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पवारांना स्वीकारणार का यांची उत्तरे काळ देईल पण पवार व समर्थकांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार कोण यावरूनही अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि पार्थ पवार असा मतभेद दिसतो आहे. घरातीलच इतकी सत्ताकेंद्रे दावा करत असताना जयंत पाटील वगैरेंना कितपत संधी मिळणार हा प्रश्न आहे. पवारांच्या या पॉवर शो नंतर आगामी राजकारणात राज्यातील ग्रा.पं. निवडणुका व नंतर मुंबई महापालिकेसह होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काँग्रेस, शिवसेना यांचे स्थान काय असणार हा प्रश्नही राजकीय पंडितांना पडला आहे. पॉवर डे ची हवा झाली असली तरी त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाचे कान टवकारणे स्वाभाविक आहे. सेनेच्या काळजातही कळकळ झाली तर आश्चर्य नको. अजून लोकसभेच्या निवडणुका दूर आहेत पण पवार पुन्हा देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत दिसत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेत भाजपा विरोधकांना एकत्र करत मोदींना व भाजपाला त्यांना शह द्यायचा आहे. पवारांना काँग्रेस महाआघाडीचे राष्ट्रीय नेतृत्व व पंतप्रधानपदाचे स्वप्न साकारायचे आहे तोच वाढदिवसाचा आणि पॉवर डे चा अर्थ आहे. राजकारणात 80 वर्षे म्हणजे फार नाही. परिस्थितीवर स्वार होत पवार सरसावले आहेत. युपीएचे अध्यक्षपद व देशाचे नेतृत्व करायची संधी त्यांना मिळणार का याचे उत्तर काळच देईल पण, पॉवर डे च्या निमित्ताने पवारांच्या स्वप्नांना धुमारे फुटले आहेत.
Previous Articleमौजे आटपाट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.