राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीनंतर दुसऱयाच दिवशी फडणवीस यांनी मुक्ताईनगरला भाजप सोडलेले ज्ये÷ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन खासदार रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे तर या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे. फडणवीस यांनी पवारांशी झालेल्या भेटीची माहिती देताना ती एक औपचारिक भेट होती असे नमूद केले आहे. मात्र ही भेट होत असताना मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातून आलेला निकाल आणि न्यायालयाने ओबीसींचे रद्द केलेले अतिरिक्त आरक्षण हे विषय सध्या सर्वोच्च चर्चेत आहेत. कोरोनाची स्थिती गंभीर असली तरीसुद्धा एखाद्याने ठाम भूमिका घेतली तर आंदोलनाचा भडका उडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा हे वाद संवेदनशील बनले आहेत. त्यातच पदोन्नतीतील आरक्षणावरून अनुसूचित जातीतील काही घटकांमध्येही धुसफूस सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात काही अनुचित घडेपर्यंत शांत राहील असे वाटत नाही. त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पवारांनी आधी मुख्यमंत्र्यांची आणि नंतर विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली असण्याचीही शक्मयता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण जरी तंग असले तरीही सामाजिक वातावरण त्याहून अधिक धुमसत आहे हे लक्षात घेऊन राज्यातील प्रभावी घटकांशी चर्चा करण्याचा पवारांनी प्रयत्न केला असेल. मात्र त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही इतकी राजकीय चर्चा गेले 18 महिने महाराष्ट्रात सुरू आहे. या सत्तांतराच्या गोष्टी तर रोजच होत असतात. विरोधी पक्षाकडून सातत्याने वेगवेगळय़ा तारखा जाहीर केल्या जातात. चंद्रकांतदादांनी त्यामुळेच कोणत्याही क्षणी सत्तांतर होण्याची शक्मयता बोलून दाखवली आहे. या चर्चेतून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला यापूर्वीच बाजूला करून घेतलेले आहे. हे सरकार आपापसातील अंतर्विरोधाने कोसळेल, आम्हाला काही करायची गरज नाही असे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना पत्रकारांनी पुढच्या तारखा विचारायचे बंद केले. जेव्हा जेव्हा दोन्ही काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू होते तेव्हा तेव्हा आपोआपच सरकारमधील अंतर्विरोधाकडे लक्ष वेधले जाऊन त्यांनी व्यक्त केलेल्या शक्मयतेवर चर्चा सुरू होते. त्यामुळे अलीकडच्या काळात फडणवीसांना तारखा जाहीर कराव्या लागलेल्या नाहीत. त्यामुळे हा योग चुकला. पुढचा कधी असे प्रश्न त्यांच्याबाबतीत तरी बंद झाले आहेत. यापूर्वी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या सोबतीने नितीश कुमार यांनी सत्ता स्थापन केली होती. तेव्हा त्या सरकारमध्ये कसा भ्रष्टाचार सुरू आहे याबाबतीत एक जोराचा प्रपोगंडा भाजपने राबवला होता. नेम तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलावर असायचा आणि टीका नितीशकुमार यांच्यासारखी चारित्र्यवान व्यक्ती या सरकारमुळे बदनाम होते अशी असायची. तेथेही केंद्रीय यंत्रणांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. नंतर एक क्षण असा आला की, या बदनामीपेक्षा भाजपसोबतच सत्ता स्थापन करू असा निर्णय घेत नितीश कुमारांनी स्वतःची प्रतिमा सांभाळत खुर्चीसुद्धा टिकवली. भाजपला महाराष्ट्राची सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट केले आहे. अर्थात आघाडी सरकारमधील मंत्रीही स्वतःच्या वागणुकीतून विरोधी पक्षाचे काम हलके करतात. त्यामुळे भाजपबाबतीत आधीच सरकारमध्ये संशयकल्लोळ आहे. कधी पवार भाजपला मिळतील असे भासवले जाते तर कधी ठाकरे. याचमुळे यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवारांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाल्याची बातमी आली आणि त्यावर शहा यांनीही संदिग्ध वक्तव्य करून चर्चेला हवा दिली. याचदरम्यान जावडेकर, हर्षवर्धन, गोयल हे मंत्री आणि भाजपचे काही आजी माजी खासदार उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टोकाची टीका आणि राजीनाम्याची मागणी करत होते. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्यांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. तौक्ते चक्रीवादळानंतर फडणवीस पुन्हा एकदा सक्रिय झाले. दरम्यानच्या काळात जातीय आरक्षण बाबत दोन केसेस राज्यसरकार कोर्टात हरले आणि निर्माण झालेल्या वातावरणात तर भाजपला पुन्हा एकदा संधी लाभली. मध्यंतरीच्या काळात पवारांवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस त्यांना भेटले, त्यात कोणतेही राजकीय संदर्भ नव्हते अशी चर्चा आता सत्ताधारी पक्षाकडून केली जाऊ लागली आहे. पण पवारांच्या बाबतीत हे सत्य म्हणता येत नाही. फडणवीस आलेच आहेत तर त्यांच्याशी कोणत्या बाबतीत चर्चा करायची हे पवारांना पक्के माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आवश्यक मुद्दे चर्चेत आणले असतीलच. आरक्षणावरून निर्माण झालेल्या गोंधळाची तर या बैठकीला नक्कीच पार्श्वभूमी आहे. प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत किती आणि राज्याच्या किती हा वादाचा मुद्दा असला तरी त्यावर चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. अशा प्रकारच्या चर्चांना पवारांनी नेहमीच दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने घरी आलेल्या विरोधी नेत्यांशी यावर चर्चा झाली नसेल हे मानणे कठीण आहे. या बैठकीचा सत्तारूढ शिवसेना आणि काँग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी राष्ट्रवादी नक्कीच उपयोग करून घेईल. पण जे पवार देशपातळीवर भाजप विरोधात विरोधकांची एकजूट बांधण्यात गर्क आहेत, शस्त्रक्रिया करावी लागली नसती तर जे बंगालच्या निवडणुकीत ममतांच्यासाठी भाजप विरुद्ध प्रचारात उतरले असते, केरळमध्ये काँग्रेसचा विरोध झुगारून ज्यांनी डाव्यांच्या बरोबर युती केली आणि तिथे निवडून आलेल्या आपल्या एकमेव आमदाराला त्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून दिले ते शरद पवार असे अचानक भाजपबरोबर सत्तास्थापनेसाठी तयार होतील हे मानणे ही कठीण. त्यामुळे आता याउपर चर्चेत दोन विरोधी विचारांचे नेते ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी आणि सदिच्छेपोटीही भेटतात ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, अशा प्रकारचा खुलासा येण्याची प्रतीक्षा तेवढी उरली आहे!
Previous Articleमारिनच्या माघारीमुळे सिंधूसह 4 दावेदारांच्या आशा पल्लवित
Next Article कॅफे सांभाळताहेत ऍसिड हल्ल्याच्या पीडिता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.