अनेक रस्ते सरकार दरबारी, कागदोपत्री डांबरीकरण झालेलेच : प्रत्यक्षात पाहिले तर खड्डेच खड्डे
वार्ताहर /किणये
प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांची पूर्तता होते का? आलेला निधी संबंधित कामासाठीच खर्ची होतो का? असे अनेक प्रश्न सध्या तालुक्याच्या पश्चिम भागातील संपर्क व काही मुख्य रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यास उपस्थित होत आहे. पश्चिम भागातील अनेक रस्ते सरकार दरबारी, कागदोपत्री डांबरीकरणाचे झालेले आहेत. मात्र प्रत्यक्षात पाहिले तर काम निकृष्ट दर्जाचे व न झाल्यासारखेच आहेत. काही रस्त्यांचे कामकाज अर्धवट आहे. यामुळे रस्त्यांवर सध्या खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून या भागातील रस्ते अक्षरशः खड्डय़ांमध्येच हरवलेले आहेत.
ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, एपीएमसी, विधानसभा, लोकसभा आदी निवडणूक प्रचाराच्या काळात गल्लोगल्ली फिरून रस्त्यांचे डांबरीकरण करणार, पाणीपुरवठा, गटारी व परिसराची साफसफाई करणार, सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मला फक्त विजयी करा, असे सांगून आश्वासनांचा पाऊस पाडणाऱयांना निवडणूक संपल्यानंतर मात्र विसर पडतोय, अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून होत आहेत. कारण पश्चिम भागातील रस्ते खड्डय़ांनी व्यापलेले आहेत.
अनेक रस्त्यावर सध्या मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेवूनच ये-जा करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांशी गावांच्या संपर्क रस्त्यांवर पाणी आले होते. यामुळे काही रस्ते वाहून गेले असून रस्त्याच्या बाजूंना मोठ-मोठे भगदाड पडलेले आहे.
बेळगुंदी-राकसकोप रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. या रस्त्यावरून वाहतूक करणे अवघड बनलेले आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या रस्त्याचे कामकाज संथगतीने चालू आहे. व बऱयाच ठिकाणी रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्यच पसरलेले आहे.
बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, बोकनूर, बाकनूर या भागातील नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असून रोज मोठय़ा प्रमाणात या रस्त्यावरून वाहतूक होत असते.
कर्ले-बेळवट्टी रस्त्यावर भगदाड
कर्ले-बेळवट्टी रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर पाणी आले होते. रस्त्याच्या बाजुने भले मोठे भगदाड पडलेले आहेत. यामुळे कर्ले व बेळवट्टी या गावांचा संपर्कच तुटलेला आहे.
नावगे-हुंचेनहट्टी, कर्ले-बेळवट्टी, संतिबस्तवाड, सोनोली, जानेवाडी आदी गावातील मुख्य व संपर्क रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही? आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
लोकप्रतिनिधींचे रस्त्याकडे साफ दुर्लक्ष
कर्ले-बेळवट्टी या संपर्क रस्त्यावरून सध्या तरी वाहतूक करणे मुश्किल झाले आहे. बहुतांशी रस्त्याच्या बाजूला मोठे भगदाड पडले आहे. तसेच खड्डय़ांचे तर साम्राज्यच या रस्त्यावर निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून बैलगाडी जाणेही मुश्किल बनले आहे. लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
– नरसिंग देसाई, कर्ले
सोनोली गावाजवळचा रस्ता पूर्णपणे खचला
बेळगुंदी-राकसकोप रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन यावे लागते. रस्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. मात्र रस्त्याचे कामकाज अगदीच संथगतीने झालेले आहे. खड्डे भरपूर प्रमाणात पडलेले असून सोनोली गावाजवळचा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. लोकप्रतिनिधींनी स्वतः या रस्त्याची पाहणी करावी व रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी आमची मागणी आहे.
– विश्वनाथ चव्हाण, बेळगुंदी
रस्त्यावर एक फुटापर्यंत खड्डे
नावगे गावाला येणारे दोन्ही रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. हुंचेनहट्टी ते नावगे व दुसरा जांबोटी रोड, व्हाया नावगे क्रॉस गावाला रस्ता आहे. हे दोन्ही रस्ते जीवघेणे बनलेले आहेत. कारण रस्त्यावर एक फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. नावगे क्रॉसपासून धान्यसाठय़ाच्या अवघड वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही वाहने इतक्या जोरात ये-जा करतात की समोरून येणाऱयाला नक्कीच धडकी भरते.
– अरुण गुरव, नावगे