अध्याय सातवा
अवधुतानी पृथ्वीला गुरु केले ते तिच्या अंगची सहनशीलता आणि क्षमावृत्ती पाहून. योग्याच्या अंगी हे दोन्ही गुण असणे आवश्यक आहे पण गंमत अशी आहे की, हे दोन्ही गुण जो अंगी बाणवायचा प्रयत्न करतो त्याला समाज नेभळट समजून त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो. हे लक्षात आल्यावर ज्याने सहनशीलता आणि क्षमावृत्ती अंगी बाणवायचा प्रयत्न सुरू केला असेल त्याचा निश्चय डळमळू लागतो. हा निश्चय डळमळू नये म्हणून त्याला आत्मिक बळाची आवश्यकता असते आणि ते साधनेतून मिळते. सहनशीलता आणि क्षमावृत्ती या गुणांचे बाहेरून दर्शन होण्यासाठी मनामध्ये सर्वांच्यामध्ये ईश्वरी अंश असल्याने आपण सर्व एकाच कुळातले असून एकमेकांचे नातेवाईक आहोत हा विचार पक्का झाला पाहिजे. म्हणजे विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेमुळे दुसऱयाने कितीही त्रास दिला वा टिंगलटवाळी केली तरी ते सहन करून त्याला क्षमा करणे शक्मय होते. माधुकरी मागायला गेले असता ज्ञानेश्वर माउलीनासुद्धा समाजाने संन्याशाचे पोर म्हणून खूप हिणवले होते आणि त्यामुळे व्यथित होऊन ते फार चिडले होते. रागारागाने परत येऊन झोपडीचे दार म्हणजे ताटी लावून आत रुसून बसले होते. त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाईने हे बघितले आणि त्यांनी ताटी उघडावी म्हणून ती त्यांची विनवणी करू लागली. ताटीचे अभंग म्हणून त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत.
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।1 । विश्व रागे झाले वन्ही । संते सुखे व्हावे पाणी ।2 ।शब्द शस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।3 । विश्वपट ब्रम्ह, दोरा ।ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।5 । मुक्ताबाई माउलींची समजूत घालतात. अर्थात माउली स्वतः श्रे÷ योगी आहेत आणि मुक्ताबाई याही थोर संत, म्हणजे प्रत्यक्षात माउलींची समजूत घालायची आवश्यकता नाही हे त्या जाणून आहेत पण त्यानिमित्ताने योगी कसा असावा, त्याचे कार्य कसे असावे याचे उत्तम मार्गदर्शन मुक्ताबाई सर्व समाजाला व विशेषतः ज्यांनी नुकतेच योगी व्हायचे ठरवले आहे त्यांना करतात. मुक्ताबाई म्हणतात, पवित्र पावन मनाच्या योग्याने जनांचे अपराध सहन करावेत. सर्व विश्व जरी रागावून अग्निप्रमाणे तप्त झाले तरी योग्याने पाणी होऊन तो राग शांत करावा. लोकांच्या शब्दांच्या शस्त्रांनी कितीही क्लेश झाले तरी संतांचा उपदेश आठवून परमशांती धारण करावी. सर्व विश्व हा एक पट म्हणजे वस्त्र असून ते ब्रह्मरूपी दोऱयाने तयार केले आहे हे लक्षात घ्यावे व सर्व ईश्वरव्याप्त आहे ही गोष्ट मनावर बिंबवावी. या सगळय़ाचा विचार करून ज्ञानेश्वरा ताटी उघड असे मुक्ताबाईंचे अर्जवाचे बोल ऐकून माउलींचा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि त्यांनी सुहास्य मुदेने ताटी उघडली.
आपण सर्व एकाच कुळातील आहोत पण जो तो प्रारब्धयोगानुसार वागत असतो ही आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे कुणावर राग काढून त्याचा अपमान करण्यात काहीच अर्थ नाही. या सर्वाचा साकल्याने विचार करून योग्याने ब्रह्मात्म ऐक्मयाचा विचार मनात रुजवावा आणि परमशांती मिळवावी.