आरोग्यमंत्री मंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याशी याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यानुसार गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत मिळाले आहेत.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच आणखी दोन महिने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे, असे तज्ञांचा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पहिले ते नववीपर्यंतच्या परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पाच घेतील, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी बसून परीक्षा दिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी काही पावले उचलणे अनिवार्य आहे. याबाबत तज्ञांच्या पथकानेही कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्याचे प्रत्येकाने पालन केल्यास कोरोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीकडे होणार नाही. त्यामुळे याला नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.
कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी सण-उत्सवांच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. मी परत एकदा नागरिकांकडे मागणी करतो की, सर्वांनी मास्क परिधान करावे. सामाजिक अंतर पाळत सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आमच्याकडे असणाऱया रुग्णालयांच्या क्षमतेनुसार परिस्थिती हाताळणे कठीण होत आहे. त्यामुळे परराज्यातून राज्यात प्रवेश आणि बेंगळूर शहरात प्रवेश करण्यावर आणखी काही निर्बंध लादणे आवश्यक आहे. तांत्रिक सल्लागार समितीनेही याचप्रद्धतीचा सल्ला दिला आहे.
सीमाभागात आणखी कडक निर्बंध लादणे आवश्यक
नागपूरमध्ये लॉकडाऊन जारी केल्याचे आम्ही पाहिले आहे. महाराष्टामधील लॉकडाऊन, सीलडाऊन निदर्शनास आले आहे. या सर्व मुद्दय़ांवर आम्ही सोमवारी होणाऱया बैठकीत चर्चा करणार आहे. चार आठवडय़ापूर्वी राज्यात 300 बाधितांची नोंद होत होती. मात्र, आता 3 हजारापर्यंत नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता घेतलेली पावले पुरेसी नाहीत. सीमाभागात कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी आपण चर्चा केली आहे, असेही मंत्री सुधाकर यांनी सांगितले.