दुबई : सौदी अरेबियानंतर आता पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातचे संबंध अत्यंत बिघडत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त अराब अमिरातने इस्रायलसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल सडकून टीका केली होती. इम्रान यांच्या याच टीकेमुळे युएईचे नेतृत्व अत्यंत नाराज झाले असून त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास टाळाटाळ चालविली आहे. युएईत पॅलेस्टॉइन समर्थक पाकिस्तानी कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. याचबरोबर कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी युएईत राहणाऱया पाकिस्तानी नागरिकांबद्दल अतिरिक्त कठोर भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानींना क्षुल्लक गुन्हय़ांसाठीही अटक करून तुरुंगात डांबले जात आहे. एका अनुमानानुसार युएईच्या अल स्वेहन तुरुंगात सुमारे 5 हजारांपेक्षा अधिक पाकिस्तानी कैद आहेत.
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने अबू धाबी येथील पाकिस्तानी राजदूत गुलाम दस्तगीर यांनी युएई प्रशासनाकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु त्यांची मागणी धुडकावून लावण्यात आली आहे. युएईत राहणारे पाकिस्तानी आता घाबरले असून त्यांना देशाबाहेर काढले जाण्याची भीती सतावू लागली आहे.
दहशतवादी हल्ला कारणीभूत
युएईच्या नव्या भूमिकेमागे इम्रान यांचे विधानच केवळ कारणीभूत नाही. 2017 मध्ये कंधार येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात युएईचे 5 मुत्सद्दी मारले गेले होते. या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे युएईच्या तपास यंत्रणेला आढळून आले आहे. याचबरोबर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. परंतु पाकिस्तानने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरविले होते.
समीकरणे बदलली
सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या बिघडणाऱया संबंधांचा प्रभाव आता इम्रान यांच्या युएईसोबतच्या संबंधांवरही पडत आहे. भारताच्या विरोधात इम्रान यांचे धोरण आणि दहशतवादासंबधी पाकिस्तानच्या नरमाईच्या भूमिकेवर सौदी अरेबिया तसेच युएईनेही उघडपणे नाराजी दर्शविण्यास प्रारंभ केला आहे.