वार्ताहर / पाचगाव
पाचगाव शांतीनगर तसेच आर के नगर सोसायटी नंबर सहा परिसरात दोन वर्षापासून उच्छाद घालणाऱ्या माकडांना ग्रामपंचायत व वन विभागा मार्फत सापळ्यात पकडून रविवारी राधानगरी अभयारण्यात सोडण्यात आले. आर के नगर , पाचगाव परिसरात दोन वर्षांपासून माकडांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. या परिसरातील अनेक नागरिकांच्या सोलरचे नुकसान केले, घरांच्या खापऱ्या माकडांनी फोडल्या. अनेक वेळा ही माकडे लहान मुले व महिलांच्या अंगावरही धावून जात होती. माकडांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
यामुळे पाचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने तसेच वनविभागाच्या सहकार्याने माकडांना पकडणाऱ्या संबंधित यंत्रणेमार्फत या परिसरातील सुमारे 90 माकडांना सापळ्यात जेरबंद करण्यात आले. या जेरबंद केलेल्या माकडांना ग्रामपंचायत व वन विभागाच्या वाहनांमधून राधानगरी अभयारण्यामध्ये सुखरूप सोडण्यात आले. या मोहिमेमुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .सरपंच संग्राम पाटील , उपसरपंच विष्णू डवरी ,ग्रामपंचायत सदस्य , वन विभागाचे अधिकारी या माकडांना जेरबंद करताना उपस्थित होते .