संतोष पवार यांचा आरोप : कोरोना संकटातही पाण्याचे राजकारण निंदनीय
प्रतिनिधी / वैभववाडी:
नळयोजनेच्या मोटारमध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस खंडित झालेला वैभववाडी शहराचा पाणी पुरवठा आता सुरळीत सुरू झाला आहे. या तांत्रिक बिघाडाचा फायदा घेत विरोधक पाण्याचे राजकारण करीत आहेत. केवळ पाचशे लिटरची एक टाकी अशा पद्धतीने पाणी वाटपाचे नाटक करणाऱया विरोधकांच्या स्टंटबाजीला कोणीही भीक घालणार नाही, अशी खरमरीत टीका वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती संतोष पवार यांनी केली.
यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, नगरसेवक रवींद्र तांबे, शिवाजी राणे, संतोष कुडाळकर, रवींद्र रावराणे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, मागील चार वर्षात वैभववाडीत कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नाही. याहीवषी अगदी मे अखेरपर्यंत शहरवासीयांना नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा सुरू होता. हे कोणीही नाकारणार नाही. मात्र, मागील दोन दिवस योजनेच्या मोटारीत बिघाड झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. ज्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो, ती विहीर शहराबाहेर आहे. त्याचबरोबर मोटार दुरुस्त अन्य शहरातून करून घ्यावी लागते. ही परिस्थिती विरोधकांना माहीत असूनही राजकारण करत आहेत. राजकारण करणाऱया विरोधकांनी मार्च, एप्रिल व मे महिने आठवावेत. या महिन्यात पाणी पातळी कमी होऊनदेखील आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पाणी पुरवठा केला आहे, असे पवार यांनी सांगितले.
पाण्याचे राजकारण निंदनीय
कोरोनासारख्या संकटात विरोधक करत असलेले पाण्याचे राजकारण हे फार निंदनीय आहे. शहराच्या अडचणी सोडविण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विरोधकांनी साथ देणे आवश्यक आहे. उगाच राजकारण करू नये. राजकारणावेळी नक्की राजकारण करू, असे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी यांनी सांगितले.