प्रतिनिधी / कोल्हापूर
समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील व संबंधित अधिकाऱ्यांसोबत 10 नोव्हेंबरला बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
गोविंदबाग, बारामती (जि. पुणे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व त्यांच्या सहकायांची बैठक झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, आनंदराव पाटील, मोहनराव यादव, चैतन्य दळवी, अंकुश शेडगे, डी. के. बोडके, संतोष गोटल, मनोहर विभूते, महेश शेलार, सचिन कदम, तानाजी बेबले, रामभाऊ शेडगे आदी उपस्थित होते.
भूमिहिनांसह शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच कुटुंबांना बंद पाईपने हक्काचे पाणी देणारा समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी 10 नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बैठक घेतली जाईल, असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले. तसेच यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा चालू असलेल्या हस्तक्षेपाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करून श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकारात चालू असलेल्या कार्यक्रमाचे कौतुकही त्यांनी केले. आपणही याबाबत एक व्यापक बैठक आयोजित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनर्वसनच्या क्षेत्रात चालू असलेल्या चळवळीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून चळवळीसोबतच्या शहादा नंदुरबार येथील 1973 च्या कांही जुन्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.