ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जल संरक्षण ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे पाण्याचा वापर प्रसादाप्रमाणे करा. त्यासाठी पाण्याबद्दलच्या आपल्या सवयी बदलाव्या लागतील. पाणी वाया घालवणे टाळा तसेच शेतकऱयांनीही कमी पाण्याच्या पिकांवर लक्ष्य केंद्रीत करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल जीवन कोशचे मोबाईल ऍप लाँच केले. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायती आणि जल समित्यांच्या पदाधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, जल संधारणासाठी आपल्याला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील. पाणी वापराबाबतच्या सवयी बदलून, पाण्याचा वापर प्रसादाप्रमाणे केला पाहिजे. कमी पाण्यात शेती कशी पिकवता येईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. गावे आणि महिलांनी पुढे नेण्याचे हे मिशन आहे. त्याचा मुख्य आधार म्हणजे लोकांची चळवळ आणि लोकांचा सहभाग. या योजनेत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल आणि राष्ट्रीय जलजीवन निधीअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांवर नळ बसविण्यात येतील. कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी आणि स्वयंसेवी संस्था या निधीला देणगी देऊ शकतात.
दरम्यान, गावात महिलांचे सक्षमीकरण हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. आमचे सरकार मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे, असेही मोदी म्हणाले.