आमदार वैभव नाईक यांची कोकण विभागीय कृषी सहसंचालकांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
पालघर जिल्हाधिकाऱयांच्या पुढाकाराने त्याठिकाणी आदिवासी भागात यावर्षी 3 लाख काजू कलमांची लागवड करण्यात येणार आहे. ही लागवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शासकीय व खासगी नर्सरीमधूनच काजू कलमे घ्यावीत, अशी आग्रही मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
जिल्हा दौऱयावर आलेल्या कोकण विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांच्यासोबत चर्चेदरम्यान आलेल्या या मुद्दय़ावर जिल्हय़ातील नर्सरीधारकांजवळ मोठय़ा प्रमाणात काजू कलमे शिल्लक असल्याने ही उचल करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधत पालघर जिल्हाधिकाऱयांशी बोलून ही कलमे उचलण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी नाईक यांनी केली.
पाटील यांच्यासोबत चर्चेदरम्यान, पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी आदिवासी शेतकऱयांना एमआरईजीएसच्या माध्यमातून 3 लाख काजू कलमे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, पालघरमध्ये काजू कलमे नसल्याने सिंधुदुर्गमधूनच ही कलमे नेण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
जिल्हय़ातील खासगी नर्सरीमधून गेल्या दोन वर्षांत अपेक्षित कलमांची उचल झालेली नसल्याने मोठय़ा प्रमाणात काजू कलमे शिल्लक आहेत. ही कलमे या लागवडीसाठी उचलल्यास नर्सरीधारकांना होणारे नुकसान टाळता येणार आहे. लागवडीसाठी योग्य दर्जाची व चांगली वाढ झालेली कलमे उपलब्ध होतील, असे सांगितले. या कलमांच्या वाहतुकीसाठी मोठय़ा खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पालघर जिल्हाधिकारी पातळीवर तरतूद करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गमधील शासकीय व खासगी नर्सरीमधून या कलमांची जास्तीत जास्त उचल करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा
त्यानंतर नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधत जिल्हय़ातील खासगी नर्सरीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात काजू कलमे शिल्लक आहेत. पालघरसाठी उचल करायच्या काजू कलमांसाठी जिल्हय़ातील शासकीय व खासगी नर्सरीतील या काजू कलमांची उचल करावी, यासंदर्भात चर्चा केली. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्यासोबत चर्चा करून जिल्हय़ातूनही ही कलमे उचलण्याची कार्यवाही करा, अशी मागणीही नाईक यांनी केली.