मनसेकडून पीडब्ल्यूडी अधिकाऱयांशी चर्चा : गणेशोत्सव आला तरी खड्डे बुजविले नाहीत!
प्रतिनिधी / कणकवली:
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये मुरूम टाकून बुजविले जातात. दरवर्षी अशाप्रकारे खर्च केलेले सुमारे दिड कोटींच्या जवळपास पैसे वाया जातात. दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ पडून असलेले पावसाळी डांबर का वापरले जात नाही? गणेशोत्सव आला, तरीही खड्डे का बुजविण्यात आले नाहीत? ही कार्यवाही तातडीने करा, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर व मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्याकडे केली. त्यानंतर आचरा मार्गाच्या खड्डय़ांची पाहणीही करण्यात आली.
आचरा, फोंडा व इतरचे जे मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहेत. त्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ मुरूम टाकून हे खड्डे बुजविले जातात. मात्र, काही दिवसांत हे खड्डे पुन्हा पडतात. त्यात शासनाचे पैसे वाया जातात. असे खड्डे पावसाळी डांबराने का बुजविले जात नाहीत? कार्यकारी अभियंता म्हणून व्हटकर असताना आलेले डांबर पडून आहे. त्याने हे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. तर आचरा मार्गाच्या कामासाठी सुमारे 7 कोटींचा निधी आला. त्यापैकी अर्धवटचे काम झालेले असून साडेतीन कोटीचे बिल अदा करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी खड्डे आहेत. कारपेटचे काम झालेले नाही. मोऱयांच्या ठिकाणी खड्डे आहेत, कामाची मुदत गतवर्षी संपली. त्यानंतर यावर्षी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, याहीवर्षी काम करण्यात आलेले नाही, असे असताना ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग मेहरबान का? असा सवाल करण्यात आला.
सुशिक्षित बेरोजगारांना काम वाटप करताना काही मर्जीतील लोकांना काम वाटणी केली जात आहे. हा प्रकार चुकीचा असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. तसेच खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करा, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला.