वार्ताहर/ किणये :
पिरनवाडी येथे गुरुवारी सकाळी ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ या फलकाचे अनावरण मोठय़ा जल्लोषात करण्यात आले. यावेळी पिरनवाडीसह परिसरातील शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. अनावरणप्रसंगी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. दोन्ही समाजाच्या प्रमुख पंचांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकीचे दर्शन घडविले.
गेल्या आठवडय़ात बेळगाव-पणजी महामार्गावर पिरनवाडी नाक्मयाजवळ क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा रात्रीच्यावेळी उभारण्यात आला होता. याचे तीव्र पडसाद पिरनवाडीत उमटले होते. यावेळी गावात तणाव निर्माण झाला होता. संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाला विरोधी नाही. या ठिकाणचा पुतळा अन्य ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी मराठी बांधवांकडून करण्यात आली होती.
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे दोन्ही समाजाच्या प्रमुख पंचांची बैठक राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आदींनी घेऊन यावर तोडगा काढला. संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा आहे त्या जागीच ठेवायचा अन् पूर्वीप्रमाणेच चौकाला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ हे नाव कायमस्वरुपी ठेवायचे, असे ठरविण्यात आले.
पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायाचा पुतळा आहे, या चौकाची रितसर नोंदही गेल्या काही वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीमध्ये केली आहे.
यावेळी गावकमिटी अध्यक्ष आप्पाजी मुचंडीकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरल, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, जयराज हलगेकर, सचिन राऊत, आप्पाजी मुचंडीकर, शिवाजी शहापूरकर, महेश पाटील, नागाप्पा सुळगेकर, पिराजी सुळगेकर मनोहर बिंदले, विजयानंद नेसरकर, राजू मुचंडीकर, नारायण मुचंडीकर, गजानन छप्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.