कर्नाटकात प्रवेश नाकारल्याने घेतला निर्णय, पोलीस प्रमुखांची मिळाली मदत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे कर्नाटकातील हजारो नागरिक वेगवेगळय़ा राज्यात अडकले आहेत. त्यांना आपल्या राज्यात येता येईना. किंवा कर्नाटकात अडकलेल्या अन्य राज्यातील नागरिकांना येथून बाहेर पडता येईना, अशी परिस्थिती आहे. चार दिवसांपूर्वी पुण्यात निधन झालेल्या मंडय़ा जिह्यातील एका महिलेचा मृतदेह घेवून जाण्यास प्रवेश नाकारल्यामुळे तिच्यावर महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आली.
रविवारी मध्यरात्री कोगनोळी येथील गायरानामध्ये मंडय़ा जिह्यातील सौम्या टी.ए. (वय 36) या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी या महिलेचे वडिल आप्पाजी, पती शरथ व पाच वर्षांची मुलगी श्वेता हे कुटुंबिय उपस्थित होते. जिल्हा प्रशासनानेही या कुटुंबियांना मदत केली.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी व चिकोडीचे प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांनी याकामी सौम्याच्या कुटुंबियांना मदत केली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी खुद्द कोगनोळीला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह घेवून जाण्यास कर्नाटकात परवानगी मिळत नाही. त्यामुळे आणखी कितीकाळ मृतदेह घेवून ताटकळत उभे राहणार, या विचाराने रविवारी मध्यरात्री कोगनोळीत अंत्यसंस्कार करावे लागले.
सौम्या ही मुळची मंडय़ा जिह्यातील तैलुरची. नोकरीनिमित्त हे कुटुंबिय पुण्यात राहते. 8 मे रोजी हृदयाघाताने सौम्याचा मृत्यू झाला. वडिल आप्पाजी व पती शरथ यांनी मृतदेह मंडय़ा जिह्यात नेवून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे प्रशासनाची परवानगी घेवून विशेष वाहनातून हे कुटुंबिय गावी निघाले. शनिवारी ते कोगनोळी तपास नाक्मयावर पोहोचले.
मंडय़ा जिल्हा प्रशासनाकडून बेळगाव पोलिसांना आधिच माहिती मिळाली होती. पुण्याहून मंडय़ाला येण्यासाठी एक मृतदेह घेवून येत आहेत. कोरोनाची चाचणी झाली नसेल तर त्यांना राज्यात प्रवेश देवू नये, अशी सूचना करण्यात आली होती. त्यामुळे कोगनोळी तपासनाक्मयावर सौम्याचा मृतदेह असलेले वाहन अडविण्यात आले. पोलिसांना मिळालेली माहिती खरी होती. तिची कोरोनासंबंधीची चाचणी झाली नव्हती. त्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला.
सौम्याचे वडील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी आपल्या परिचयातील राजकीय नेत्यांकरवी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मंडय़ा जिल्हा प्रशासनाने मात्र काही केल्या जिह्यात प्रवेश देण्यास तयार झाले नाही. कारण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे मृत्यूमुखी पडलेल्या मंडय़ा जिह्यातील एका रहिवाशाची अंत्यक्रिया जिह्यातच झाली होती. मृतदेहासोबत मुंबईहून आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी ताठर भूमिका घेतली होती.
मंडय़ा येथील घटना तर शनिवारी अजमेरहून बेळगाव जिह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱया 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना लक्षात घेवून कोणत्याही परिस्थितीत सौम्याचा मृतदेह कर्नाटकात घेवून जाता येणार नाही, अशी भूमिका कर्नाटक प्रशासनाने घेतली. रविवारी रात्रीपर्यंत कुटुंबियांनी प्रतिक्षा केली. अखेर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सौम्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन आता मृतदेह माघारी नेण्यातही अर्थ नाही. येथेच अंत्यसंस्कार करा, असा सल्ला दिला. त्यामुळे रविवारी मध्यरात्री कोगनोळी जवळ या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
जेथे मृत्यू होतो तेथेच अंत्यसंस्कार करा
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अंत्यसंस्कारांसाठीही राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना सुचना दिल्या आहेत. जेथे ज्यांचा मृत्यू होईल तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा, गावी नेण्याचा प्रयत्न करु नका, मग तो परराज्यातून येणारा मृतदेह असो किंवा एका जिह्यातून दुसऱया जिह्याला मृतदेह नेण्यासही परवानगी देवू नका, अशी सूचना अधिकाऱयांना करण्यात आली आहे.
प्रशासनाने परवानगी नाकारली
यासंबंधी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सौम्या या महिलेचे निधन होवून तीन दिवस पूर्ण झाले होते. कोरोना चाचणी झाली नाही म्हणून मंडय़ा जिल्हा प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे सीमेवर मृतदेह असलेले वाहन अडवावे लागले. माणुसकीच्या नात्याने विचार करुन या महिलेवर कोगनोळी येथील गायरानात अंत्यसंस्कार उरकण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.