ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये केवळ २ हजार ५०० संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केले आहे. म्हणजे केवळ १० टक्के संस्था नोंदणीकृत आहेत. पुण्यासारख्या शहरात देखील मानीव अभिहस्तांतरणाला अतिशय कमी प्रतिसाद आहे. केवळ १९००० सोसायट्या नोंदणीकृत आहेत. मोठ्या प्रमाणात मानीव अभिहस्तांतरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, या अंतर्गत पुणेकरांनी मानीव अभिहस्तांतरण करुन घ्या, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एन.ए. अनपट भोसले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण संस्थांना मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यावतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत गृहनिर्माण संस्था यांचे मानीव अभिहस्तांतरण संदर्भात चर्चासत्राचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एन.ए. अनपट भोसले, अॅड. अंजली कलंत्रे चर्चासत्रात सहभागी झाले होते. शिल्पा देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
एन.ए. अनपट भोसले म्हणाले, मानीव अभिहस्तांतरण वेळीच केले नाही , तर भविष्यात पुनर्विकासाला अडचणी येऊ शकतात. पुनर्विकासाचा फायदा करुन घेण्यासाठी जमिनीचा मालक असणे आवश्यक आहे. सोसायटीची नोंद झाली की सोसायटी डीड करुन घ्या. मानीव अभिहस्तांतरणाकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु जागेचा मालकी हक्क मिळविणे आवश्यक आहे.
अॅड. अंजली कलंत्रे म्हणाल्या, मानीव अभिहस्तांतरण केले नाही तर सगळे अधिकार बिल्डरकडे असतात. त्यामुळे मानीव अभिहस्तांतरण गरजेचे आहे. कमीत कमी कागदापत्रात मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होते. मानीव अभिहस्तांतरणाची गरज नाही अशा अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या परंतु मालकी हक्क प्राप्त करण्यासाठी आणि सात बाऱ्यावर नाव येण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण आवश्यक आहे.