प्रतिनिधी/ सातारा
गेल्या आठवडय़ाभरापासुन वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण. सोमवारी ही जिल्हय़ाच्या कित्तेक भागात तुरळक पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे एप्रिल महिना आहे हे सध्या जानवतच नाही. कारण या अवकाळी पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. आधीच कोरोना त्यात वातावरण बदल त्यामुळे या वातावरण बदलाची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
याचा सर्वाधिक परिणाम हा शेतीपिकांवर होत आहे. कारण सध्या कांदे, गहु-ज्वारी, सोयाबीन सारखी पिके त्याचबरोबर आंबा, कलिंगड, दाक्षे सारख्या बागायत पिकांवर आणि भाजी-पाला उत्पादनांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कित्तेक शेतीमालाचे नुकसान ही तितकेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
कमी दाबचा पट्टा निर्माण झाल्याने अशा प्रकारे वातावरणात बदल झाला असल्याची नोंद हवामान खात्याने वर्तविली आहे. छत्तीसगड, कर्नाटक, बिहार सारख्या राज्यांत ही अवकाळी पावसाने चांगलाच हौदोस घातला आहे. पुढील चार दिवस ही अशाच प्रकारे वातावरणात कमालीचा बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.