सिलीगुडीच्या माटीगारा-नक्षलबाडी मतदारसंघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी प्रचारसभा होणार आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यान त्यांची ही पहिलीच प्रचारसभा ठरणार आहे. राज्यात जवळपास अर्धी (8 टप्प्यांपैकी चार) संपली असून प्रचारमोहीम संपुष्टात येण्यास केवळ आता 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या नेत्याची बंगालमध्ये पहिली सभा होणार आहे.
बंगालमध्ये राहुल गांधी यांचा प्रवेश पक्षासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आमचे मतदार आणि कार्यकर्ते यामुळे प्रेरित होतील. आम्ही बीजूमलच्या विरोधात लढत आहोत, जो भाजप प्लस तृणमूल आहे. कारण भाजपचे बहुतांश उमेदवार हे पूर्वीचे तृणमूल काँग्रेसचे नेते असल्याचा दावा राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मालाकार यांनी केला आहे.
बंगालमध्ये काँग्रेस विरोधाभासाच्या स्थितीला सामोरा जात आहे. राहुल यांनी प्रचारासाठी बहुतांश वेळ तामिळनाडू आणि केरळमध्ये दिला आहे. काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे, पण केरळमध्ये डाव्या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढत आहे. केरळमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. काँग्रेससोबत आघाडी करणाऱया आयएसएफचे नेते अब्बास सिद्दिकी यांनी 135 वर्षे जुन्या पक्षाच्या प्रचारातील अनुपस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली होती.
मुस्लीम मतांवर लक्ष
राहुल यांनी राज्यात किमान 12 प्रचारसभा घ्याव्यात अशी पक्षाच्या उमेदवारांची मागणी आहे. विशेषकरून मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्हय़ांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा मोठा प्रभाव असून तेथील मुस्लीम समुदाय काँग्रेसच्या बाजूने असून या ठिकाणी त्यांच्या सभा होण्याची गरज असल्याचे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
14 एप्रिल रोजी माटीगारा-नक्षलवाडीमध्ये राहुल गांधी यांची पहिली सभा आहे. दुसरी सभा उत्तर दिनाजपूर जिल्हय़ाच्या गोलपोखरमध्ये होणार आहे. या मतदारसंघातील सुमारे 74 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. तृणमूल काँग्रेसने मुस्लिमांसाठी काहीच केलेले नाही. केवळ काँग्रेस-आयएसएफ-डावे पक्षच भाजपला रोखू शकतात असे मुस्लिमांना आता वाटू लागले आहे. अशा सिथतीत राहुल गांधी यांच्या सभेकडून मोठय़ा अपेक्षा असल्याचे गोलपोखरचे काँग्रेस उमेदवार मोहम्मद नसीम अहसान यांनी म्हटले आहे.
गोलपोखरमध्ये काँग्रेसने 2006 मध्ये अखेरची निवडणूक जिंकली होती. तेव्हा काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांच्या पत्नी दीपा यांनी निवडणूक लढविली होती. या मतदारसंघातील तृणमूल, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवारही मुस्लीमधर्मीय आहेत. तृणमूलचे मोहम्मद गुलाम रब्बानी मागील एक दशकापासून येथील आमदार आहेत.
भाजपची नजर राहुल गांधी यांच्या प्रचारसभांमुळे तृणमूल काँग्रेसलाच फटका बसणार असल्याचे भाजपचे मानणे आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर जिल्हय़ांमध्ये भाजपने काही मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. भाजपने आतापर्यंत उघडपणे काँग्रेस-डाव्या पक्षांवर टीका करणे राज्यात टाळले आहे. भाजप केवळ तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांनाच लक्ष्य करत आहे.