महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. मे अखेर लॉकडाऊन कायम आहे, अशा आशयाची अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन चारचे सूतोवाच केले होते आणि आजची कोरोनाची देशातली आणि मुंबईची अवस्था पाहता लॉकडाऊन चारची गरजही होती. कोरोनाची रणभूमी अवघे विश्व असले तरी अमेरिकेत न्यूयॉर्क आणि महाराष्ट्रात मुंबई हे या युद्धभूमीचे जीवघेणे हॉटस्पॉट ठरले आहेत. जगातील काही देशांनी काटेकोर लॉकडाऊन पाळून कोरोना नियंत्रणात ठेवताना लॉकडाऊनमधून मुक्ती साधली आहे. या पार्श्वभूमीवर आपणासही लॉकडाऊनमधून मुक्ती हवी असेल तर घरात कोंडून घेणे, कोरोनाची साखळी तोडणे आणि सरकारी प्रयत्नांना, नियमांना मनापासून साथ देणे महत्त्वाचे आहे. अन्यथा लॉकडाऊन पाच, सहा हे दुष्टचक्र आणि बळींची संख्याही वाढत राहणार हे वेगळे सांगायला नको. प्रारंभीच्या काळात लॉकडाऊन कडेकोट पाळा आणि कोरोनाला पराभूत करा अशी भावना होती आता लॉकडाऊनचे 54 दिवस होत आले. आता सारे बंद ठेवून चालणारे नाही. अन्यथा भूकबळी जातील, मनोरुग्ण वाढतील आणि देश आर्थिक संकटाच्या खाईत पडेल. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन चार वेगळा असेल असे म्हटले आणि राज्य व केंद्र सरकारची पावले त्या दिशेने पडत आहेत. उद्योगांना परवानगी, काही रेल्वे सुरु, गावी जाणाऱया मजुरांची सोय, गरिबांना धान्य, रिक्षा वगैरे वाहतुकीला काही अटीवर अनुमती, शेती उद्योग सुरु असे अनेक निर्णय अर्थचक्र रुतून बसू नये यासाठी घेण्यात आले आहेत आणि आपण भारतीय नागरिक म्हणून त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कोरोनाशी लढा ही घोषणा आता कोरोना सोबत रहायला शिका अशी परिवर्तीत झाली आहे. ओघानेच कोरोना संकट व जीवाणू लगेच नष्ट होणारा नाही, त्यामुळे यापुढे कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही. सोशल डिन्स्टसिंग पाळायचे. तीन फूट अंतर आणि मास्क काटेकोर वापरायचा. हात धुणे, स्वच्छता, नियम पाळणे हे भावी काळासाठी निरंतरचे झाले आहे. या नव्या जीवनशैलीची सवय करून घेतली पाहिजे आणि या संकटात संधी शोधताना उद्योग, व्यापार, शेती यातून आघाडी घेतली पाहिजे त्यासाठीच वीस लाख कोटींचे पॅकेज मोदींनी जाहीर केले आहे. भारतीय तरुण या संकटात संधी शोधतील आणि देशाला अव्वल बनवतील अशी त्यामागे धारणा आहे. आजवर सबसिडी, अनुकंपा, मदत असे शब्द ऐकण्याची सवय झालेल्या मंडळींना आत्मनिर्भर हा शब्द पेलताना कठीण जातो आहे. पण या शब्दाची बीजे महात्मा गांधींच्या स्वदेशीत आणि स्वयंपूर्ण ग्रामराज्य, रामराज्यात आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. स्वदेशीचा आग्रह आम्ही सर्व नागरिकांनी धरला आणि स्थानिक व्यापारी, स्थानिक उत्पादक, स्थानिक मजूर आणि देशी उत्पादनांनाच प्रतिसाद अशी भूमिका घेतली तर चमत्कार होईल हे वेगळे सांगायला नको. यातून क्रयशक्ती वाढेल, समृद्धी येईल, स्थानिक ब्रँड मोठे होतील, गुणवत्ता वाढेल हे ओघाने होईल पण त्यासाठी निर्धार हवा. लॉकडाऊन चार बाबत केंद्र सरकार मार्गदर्शक सूचना करणार आहे आणि स्थानिक पातळीवर झोन ठरवण्याचे व निर्णय करण्याचे अधिकार द्या अशी महाराष्ट्राकडून मागणी होते आहे. मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर, मालेगाव इथली रुग्णसंख्या पाहता तेथे काही सवलती मिळतील असे वाटत नाही. राज्यात कोरोनाबाधीत रुग्ण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. गोव्यात आणि कर्नाटकात सीमाभागात रुग्ण वाढत आहेत. देशातही रुग्णसंख्या वाढली आहे. चीनच्या रुग्णसंख्येला आम्ही मागे टाकले आहे. शेजारी पाकिस्तानात लॉकडाऊन पाळला गेला नाही तेथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. भारतातही रमजानचा उपवास मुस्लीम बांधव पाळत आहेत. पंढरीची आषाढी वारी समोर आहे. अशावेळी लॉकडाऊन चारमध्ये काही सवलती असल्या तरी सर्व सामान्य भारतीय नागरिकांनी आपले कर्तव्य आणि या महामारीत पाळावयाचे भान किंचितही ढळू देता कामा नये. हे दिवस जातील, स्वच्छ मोकळे आनंदी जग पुन्हा नाचू-खेळू लागेल हा विश्वास कायम ठेवताना लॉकडाऊन चारचा स्वीकार आणि अंमल करायला हवा. या संकट काळात गरीब,अती गरीब माणूस अडचणीत आहे. त्याला बळ देण्यासाठी सरकारी पातळीवर, सामाजिक पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहेत. पण गाव करेल ते राव करु शकत नाही. आपल्या जवळच्या गरीब माणसाला घासातला घास द्या. मदत करा. यातून माणुसकी जिंकेल आणि भारतही जिंकेल त्याच जोडीला पोलीस, डॉक्टर, परिचारिका व कोरोना वॉरियर्स दमले आहेत. या युद्धावर नवी कुमक दाखल होते आहे पण आपण नियम, शिस्त व सूचना पाळून या योद्धय़ांचे काम सोपे करुया. जग चालवणारी जी शक्ती आहे ती सुखाची सारीच दारे बंद करीत नाही. या अडचणीत आणि कोरोना तांडवात एक सुखाचे दार उघडते आहे. पावसाने चांगली वार्ता दिली आहे. मोसमी पाऊस अंदमानात वेळेवर येणार आणि देशभर चांगला बरसणार असे वृत्त आहे. या खरीप हंगामात बळीराजाकडे भारताला बलशाली करण्याची शक्ती आहे. सुखाचे हे दार उघडते आहे. राज्यकर्ते नियोजनकर्ते आणि कृषी संबंधित सर्वांनी याचा लाभ घेत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी केला पाहिजे. आज महामारीतही 54 दिवस सारे बंद असून कुणाचा भूक बळी गेला नाही ही बळीराजाची पुण्याई आहे. भारताचे धान्य कोठार भरलेले आहे. या खरीप हंगामात तेलबियासह जी कमतरता आहे ती पूर्ण करण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची जिद्द बाळगूया, काहीही अशक्य नाही. पुन्हा तेच लॉकडाऊन नशिबी आले असले तरी त्यामध्ये अनेक चांगल्या संधी आहेत. निराशा सोडून कोरोनासोबत राहण्याची सवय करून आपण यश मिळवले पाहिजे.
Previous Articleआत्मनिर्भर
Next Article लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेताय ?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.