नेमके गौडबंगाल काय? हलगा-मच्छे बायपासला लागूनच आणखी रस्ता काढण्याचा डाव
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱयांनी लढा दिला. त्याला यश आले. पूर्वीचे नोटीफिकेशन न्यायालयाने रद्द करुन केंद्र आणि राज्य सरकारला दणका दिला. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला. असे असताना धामणे रस्त्यावरील डॉ. संपत पाटील यांच्या शेताला लागूनच पुन्हा एक सर्व्हेचा दगड रोवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांमधून पुन्हा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून कोणालाही विश्वासात न घेता आणखी कोणता रस्ता करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन रस्त्याचे नेमके गौडबंगाल काय? येळ्ळूर केएलईला लागूनच जुने बेळगाव शिवारातून हा रस्ता येडियुराप्पा मार्गाला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यरमाळ रोडवर रोवण्यात आलेला दगड शेतकऱयांनी यापूर्वीच उखडून काढला होता. त्यानंतर आता पुन्हा धामणे रस्त्यावर दगड रोवण्यात आला आहे. केवळ मराठी भाषिकांच्या जमिनीतूनच रस्ता करुन एक प्रकारे दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱयांना विश्वासात न घेता सर्व्हे करण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे अनेक रस्ते आहेत. त्या रस्त्यांचे रुंदीकरण केल्यानंतर इतर रस्त्यांची काहीच गरज नाही. तरीदेखील शेतकऱयांच्या जमिनी हडप करण्याचे प्रकार प्रशासनाकडून होत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पिकाऊ जमिनी घेतल्या तर शेतकऱयांनी जगायचे कसे असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.