“तुला समजलं का? यंदाच्या बारा जून रोजी पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त – ’’
“लॉकडाऊनमुळे त्यांच्या चाहत्यांना जाहीर कार्यक्रम करता आले नाहीत. त्यामुळे ते निराश झाले. पण सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे स्मरण केले. सालाबादप्रमाणे सोशल मीडियावर ‘पु. ल. आता कालबाह्य झाले आहेत का?’ या विषयावर खडाजंगी वाद रंगला. कोणी कोणी फेसबुकवर लाईव्ह येऊन पुलंना स्मरणांजली वाहिली. हेच सांगायचंय ना तुला?’’
“तू मला पुरतं बोलूच दिलं नाहीस. अरे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या हस्ताक्षराचा फॉन्ट तयार केला आहे. वर्तमानपत्रात जिकडे तिकडे पुलंचं हस्ताक्षर झळकत आहे. स्मृतिदिनाची बातमी त्यांच्या हस्ताक्षरात. त्यावेळी वेगवेगळे दिग्गज काय बोलले ते देखील पुलंच्या हस्ताक्षरात. अगदी सचिन तेंडुलकर, नरेंद्र जाधव वगैरे लोक या प्रसंगी काय म्हणाले ते देखील पुलंच्या हस्ताक्षरात. मला तर असा भास झाला की धमाल आहे नुसती, धम्माल. तुला एक कल्पना सांगतो. प्रकाशकांनी पुलंची पुस्तकं या फॉन्टमध्ये छापली पाहिजेत. म्हणजे काय होईल, पुलंचं लेखन तसं ते आपण वाचलेलं असतंच रे पण हे लेखन त्यांच्या हस्ताक्षरात वाचल्याचा आनंद मिळेल. तुला काय वाटतं? मजा येईल की नाही?’’
“नाही येणार.’’ “आं? काय रे? असं का म्हणतोस?’’
“पुलंच्या लेखनाची गुणवत्ता, त्यातून आपल्याला मिळालेला आनंद हा त्यांच्या हस्ताक्षरावर अवलंबून नव्हता, तर त्या लेखनातल्या आशयावर अवलंबून होता. आपली मने पुलंशी जोडली गेली ती त्यांच्या हस्ताक्षरामुळे नव्हेत, तर त्यांच्या लेखनाच्या आरशात आपल्याला दिसलेल्या आपल्याच प्रतिमांमुळे, आपल्या सुखदु:खाच्या समान कल्पनांमुळे, श्रद्धांमुळे, सुधारणावादी विचारांच्या आकर्षणामुळे. पुलंची पुस्तकं पुन्हा या नव्या फॉन्टमुळे याहून निराळा आनंद मिळेल असं वाटत नाही. मला अजून एक धोका दिसतोय. पुलंनी आपल्या हयातीत अनेकांना कौतुकपर, शिफारसवजा किंवा खाजगी जिव्हाळय़ाची पत्रे लिहिली. ही पत्रे म्हणजे त्या त्या व्यक्तींच्या संग्रहातला मौलिक ठेवा आहे. आता या फॉन्टच्या सहाय्याने त्यांच्या शैलीची मोडकी तोडकी नक्कल करून कोणी बनावट पत्रे बनवून सोशल मीडियावर टाकली तर कालांतराने पुलंची खरी पत्रे आणि बनावट पत्रे यांचा गोंधळ उडण्याची शक्मयता आहे.’’
“तू म्हणजे अतिशय अरसिक आहेस, सिनिक आहेस.’’
“असेन बाबा. मला माफ कर.’’