बेंगळूर
राज्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक मदतनिधी मंजूर करण्याची मागणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. शिमोगा जिल्हय़ाच्या शिकारीपूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि कोनशिला कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अधिक मदतनिधीसाठी दबाव आणण्यात येईल. पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी आपल्याशी पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. राज्यातील जनतेच्या पाठिशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच आवश्यक अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली आहे. त्यामुळे आठवडाभरात नुकसानीबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. राज्यात पूरग्रस्तांच्या मदतीची कामे युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. त्याकरिता अनुदानाची कमतरता नाही, असे येडियुराप्पा म्हणाले.