प्रतिनिधी /पणजी
आपण इथे आलो ते सर्वांशी हितगुज साधण्यासाठी तसेच सर्वांची मते आजमावून घेत आहोत. आपण अनेक गोष्टींचा अभ्यासही केला. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. आमच्यातील एकही आमदार बाहेर जाणार नाही. आम्ही गोव्यात पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनाच उमेदवारी मिळणार असे नाही, काहींना पक्षासाठी त्याग करावा लागणार तशी तयारी ठेवा, असा भाजपच्या आमदारांनाही सल्ला देण्यास देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत.
गेले दोन दिवस भाजपचे गोवा प्रभारी आणि निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना अनेक गोष्टी उघड केल्या. आपला स्वभाव मोकळा आहे. मी काही दडवून ठेवत नाही. सर्व आमदार असो मंत्री यांच्याशी आपण वैयक्तिकरित्या भेटलो. त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे राजकारणात नेमके काय चाललेय याचीही आपल्याला कल्पना आली. गोव्यात आपण यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत आलोय. तत्पूर्वी 2007 मधील निवडणुकीत देखील आपण भाजपचा प्रचार केलेला आहे. 2017 च्या निवडणुकीत देखील आपण अनेक प्रचारसभा देखील घेतलेल्या आहेत.
सदानंद तानावडेंचे पक्षासाठी खुप चांगले कार्य
गोवा व महाराष्ट्र हे एकमेकाला परके नाहीत व संस्कृतीमध्येही फार मोठा फरक नाही. महाराष्ट्रातील राजकारणाच्या तुलनेत गोव्याचे राजकारण पुष्कळ चांगले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यपद्धतीत अलिकडे झालेला बदल हा त्यांनी अनुभवातून केलेला आहे. प्रशासनावर आता त्यांची पूर्णतः पकड बसलेली आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे हे पक्षासाठी खूप चांगले काम करतात. अनेकवेळा आपण अनुभव घेतो की प्रत्येक नेता हा प्रदेशाध्यक्षाविरुद्ध तक्रारींची जंगीच मांडत असतो. इथे मला वेगळाच अनुभव आला. एकाही नेत्याने प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात तक्रार वा कैफियत मांडली नाही. उलटपक्षी त्यांच्या कार्याचे कौतुक करणारेच अनेकजण आपल्याला भेटले.
त्याग करण्याची तयारी ठेवा
सर्वांनाच उमेदवारी देणार आहात का ? की वेगळा विचार करणार आहात या प्रश्नाला उत्तर देताना गोव्याच्या राजकारणाचा बराच अभ्यास केलेले आणि येथील भाजपच्या बऱयाच नेत्यांची नाडी तपासलेले फडणवीस म्हणाले की, केवळ त्या व्यक्तीने केलेला विकास किंवा जिंकून येण्याची क्षमता आहे म्हणून सर्वकाही पाचणारे आहे, असे नाही. उमेदवारी देताना या गोष्टींचा जरूर विचार होणारच, शिवाय काहींना त्याग करण्याची तयारी ठेवावी लागेल. भाजपला या निवडणुकीत अतिशय चांगली संधी प्राप्त झालेली आहे. केवळ थोडी मेहनत करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मात्र एक संगतो, आमच्यातला एकही आमदार हा पक्ष सोडून जाणार नाही. आम्ही त्याची सर्वांचीच काळजी घेणारे आहोत.
पंतप्रधानांबद्दल जनतेत आपुलकीची भावना
गोव्यातील जनतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे. भाजपचे कार्यकर्ते हे आमचे बळ आहे व या बळाच्या आधारे ताकदिनीशी आम्ही पुन्हा रिंगणात उतरलो आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खूप चांगले काम केलेले आहे. आपण पक्षाचा एक प्रतिनिधी या नात्याने सांगत नाही. परंतु जे महाराष्ट्राला जमले नाही ते या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करून दाखविले. आज देशात महाराष्ट्र हे आर्थिकदृष्टय़ा एक अत्यंत महत्त्वाचे व कणखर राज्य आहे. कोविडच्या काळात ज्यांचा व्यवसाय गेला त्यांना महाराष्ट्राने मदत दिली नाही. डॉ. प्रमोद सावंत यांनी छोटय़ा छोटय़ा घटकांना देखील मदत केली आहे.
अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार
आम्ही या निवडणुकीत नव्याने बहुमत मिळविणार आहोत. या सरकारने आपली प्रगती जनतेला दाखवून दिलेली आहे. गोव्याची जनता प्रेमळ आहे. आपण मुद्दामहून प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची मते जाणून घेतोय. त्यांच्या भावनांची कदर पक्ष निश्चितच करील. आपण येथून बुधवारी सकाळीच मुंबईला जाणार, त्यानंतर आपला अहवाल नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना सादर करणार, आम्हाला काही उपाययोजना हाती घ्यावयाच्या आहेत. त्या आम्ही जरूर घेणार आहोत.
ते आमदार अपात्र होऊच शकत नाहीत
आपण केवळ मंत्री आमदारांनाच भेटलो असे नाही, तर पक्षाच्या पदाधिकाऱयांनाही भेटलो. अवघ्याच दिवसांनी आपण परत येणार त्यावेळी काही कार्यकर्त्याना देखील भेटणार. येथील परिस्थितीची मला जाणीव आहे. आपण सर्वांशीच मोकळेपणाने बोललेलो आहे. त्यामुळे त्यांच्या भावना जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न केला आहे. आमच्या पक्षात 12 जण इतर पक्षातून आलेले आहेत. त्यांना सोबत घेऊन आम्हाला जायचे आहे. अनेक राज्यात सरकार पाडण्यासाठी पक्षांतर होते. इथे सरकार मजबूत करण्यासाठी पक्षांतर झालेले आहे. 10 जणांनी पक्षांतर केलेले आहे. त्यांच्याविरोधात याचिका असल्या तरी ते अपात्र होऊच शकत नाहीत. कायदेशीर सर्व बाबींची तरतूद त्यांनी केलेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस आज मुंबईला रवाना देवेंद्र फडणवीस पक्षाच्या नेत्यांचे मंत्र्यांचे व आमदारांचे मनोधैर्य राबविण्यासाठी गोव्यात आलेले हेते. आज येथून ते मुंबईला रवाना होतील. आपल्या गोवा दौऱयात त्यांनी एकही क्षण वाया घालवेला नाही. हेच त्यांचे वैशिष्टय़. शांत व अभ्यासू असे हे व्यक्तिमत्त्व असले तरीही पक्षातील नेते गैरमार्गाने जात असतील तर त्यांनाही ते मार्ग दाखवतील हे स्पष्ट होते.