प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पार्टीने आपल्याला पेडणे ऐवजी मडगाव मतदारसंघातून उभे रहा, असा प्रस्ताव दिलेला होता. परंतु आपली पेडणे ही कर्तृत्व भूमी ठरलेली आहे. या मतदारसंघातून 4 वेळा विजयी झालेलो आहे, तसे सांगून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपण पेडणूतूनच निवडणूक लढविणार, असे जाहीर केले. दै. तरुण भारतशी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपल्यालाच उमेदवारी देणार असा पुन्हा एकदा आत्मविश्वास व्यक्त केला. आपण मडगावात खूप चांगले कार्य केलेले आहे. मडगावातील जनतेचा आपण परिचयाचा आहे. त्यामुळे आपल्याला मडगावात कोणताच धोका नाही. परंतु, आपण जी काही विकासकामे आजवर केली ती सर्व पेडणेमध्ये जास्त प्रमाणात केलेली आहेत. आणि पेडणेकर जनता आपल्याच पाठीशी राहणार. ते अन्य कोणाचाही विचार करणार नाहीत, असे बाबू आजगावकर म्हणाले. आपण पक्षाला सांगितले आहे की, आपण पेडणेतूनच निवडणूक लढविणार व आपल्या निर्णयात बदल होणार नाही. तरीदेखील पक्षाने उमेदवारी नाकारली तर त्यानंतरच निर्णय आपण जाहीर करीन, असे बाबू आजगावकर म्हणाले.