केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे केपे येथील कृषी महोत्सवात प्रतिपादन : भारताचा पहिल्या दहा देशांत समावेश
वार्ताहर /केपे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत कृषी क्षेत्रामध्ये संपूर्ण जगातील देशांच्या यादीत पहिल्या दहा स्थानांमध्ये पोहोचला असून येणाऱया काळात पहिल्या पाच देशांत स्थान प्राप्त करेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला. ते केपे येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली जो. वेळीप, शाणू वेळीप, सिद्धार्थ गावस देसाई, संजना वेळीप, नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक दयेश नाईक, प्रसाद फळेदसाई, अमोल काणेकर, गणपत मोडक, चेतन हळदणकर, सरपंच जासिंता डायस, अविनाश वेळीप, नेविल आफान्सो, प्रवीण कुमार व इतर मान्यवर हजर होते.
पूर्वी शेतकऱयांना कर्जे देण्यासाठी 6-7 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जायची. आता ती वाढवून 16 लाख कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱयाला प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रु. देण्याची योजनाही राबवली आहे. कोविडच्या काळात सुद्धा 2 लाख 44 हजार शेतकऱयांना किसान कार्डे देण्यात आली. 11 हजार कोटी रुपयांचे ऑईल पाम मिशन सुरू करून शेतकऱयांना आधार देण्याची योजना राबवण्यात येत आहे, असे मंत्री तोमर यांनी पुढे बोलताना सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासाबरोबर कृषी क्षेत्रातही उन्नतीच्या मार्गावर असून गोव्यात युवा नेतृत्व असलेले मुख्यमंत्री व कृषिमंत्रीही चांगले काम करत आहेत, असे उद्गार त्यांनी काढले.
दूध क्षेत्रात पूर्वी कधीच किसान कार्ड मिळत नव्हते. आता त्यांनाही मिळत आहे. युवावर्ग कृषिक्षेत्रात येत असून ही चांगली गोष्ट आहे. शेतकऱयांच्या कृषिमालाला आधारभूत किंमत देण्यात येत असून शेतकऱयांवर कधी अन्याय केलेला नाही. अन्न प्रक्रिया प्रकल्प प्रत्येक तालुक्मयात होणे गरजेचे असून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. त्याची सुरुवात डिचोलीतून करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गोवा स्वयंपूर्ण होण्याकरिता सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
गोव्यातील शेतकरी कुठेच कमी पडू नये याकरिता सरकार कटिबद्ध असून शेतकऱयांना प्रोत्साहन देण्याकरिता अनके योजना राबवल्या आहेत. गोवा हे कृषिप्रधान राज्य करण्याचा ध्यास असून त्या दृष्टिकोनातून विविध पावले उचलली आहेत. अनेक भाग शेतीपासून दूर गेले होते. ते पुन्हा शेतीकडे वळत आहेत ही चांगली गोष्ट आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले. यावेळी कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांचा केंद्रीय मंत्री तोमर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.