प्रतिनिधी/ बेळगाव
टॅक्सीवर यलो कार्ड बसवा म्हणून जी दडपशाही सुरू आहे ती तातडीने थांबवावी. कोरोनामुळे व्यवसाय नाही, त्यातच महाराष्ट्र, गोवा आणि कारवार जिह्यातील पोलीस टॅक्सीचालकांना नाहक त्रास देत आहेत. तो थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी जिल्हा टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून व्यवसाय नाही. काही दिवसांपूर्वी आम्हाला टॅक्सी सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रवासी घेऊन जर व्यवसाय करत असाल तर यलो कार्ड बसवावे, असा आग्रह धरण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी घेण्यात येणारे शुल्क परवडणारे नाही. वर्षाला 10 हजार ते 12 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे ट्रक्सी मालक व चालकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
इतर रोजगार नाही म्हणून टॅक्सी व्यवसाय आम्ही करत आहोत. मात्र, महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातील चार चाकी वाहने अडवून त्या टॅक्सी चालकांना दडपशाही करण्यात येत आहे. सहा प्रवाशांसाठी 1600 रुपये तीन महिन्याला तर सात प्रवाशांसाठी 4 हजार रुपये, 30 प्रवाशांसाठी 10 हजार रुपये अशा प्रकारे कर भरावा लागणार आहे. मात्र, भाडेकरूंकडून भाडे किती घ्यायचे? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने आम्हाला योग्य प्रकारे व्यवसाय करण्यास मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आरटीओ आणि पोलिसांकडून होणारा जाच थांबवा
व्यवसाय करत असताना अचानकपणे आमचे वाहन अडवून कागदपत्रांची विचारपूस केली जाते. कागदपत्रे योग्य असतानाही काही तरी कारण पुढे करून दंड आकारला जात आहे. बऱयाच ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. बेळगाव जिह्यामध्ये तसेच कारवार जिह्यामध्ये अधिक त्रास असून टॅक्सी चालकांना नाहक त्रास देवू नये अशी सूचना करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नजीर एफ. सुरकोड, उपाध्यक्ष चंद्रशेखर बसुर्तेकर, मल्लिकार्जुन पिसे, लक्ष्मण नाईक, सुरेश अरळीकट्टी, महेश शहापूरकर, मंजु कदम, बापूसाब अत्तार, मधुकेश एणगीमठ, सूरज सुधाकर पाटील यांच्यासह टॅक्सी चालक उपस्थित होते.