प्रतिनिधी / इस्लामपूर
वारणा धरणग्रस्त,व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या ३०-३५ वर्षातील महत्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहीमद्वारे आम्ही सोडवू शकलो,याचे मोठे समाधान आम्हा सर्वांना आहे. जल संधारण खात्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्यासाठी नोकरीमध्ये जे पाच टक्के आरक्षण आहे. ते दहा किंवा पंधरा टक्के करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच करून घेवू, असा विश्वास राज्याचे जल संपदामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथे माणकेश्वर हॉलमध्ये सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ती व फल निष्पती मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आ.मानसिगभाऊ नाईक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, युवा नेते प्रतिक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील २९ वसाहतीमधील प्रकल्पग्रस्तांना जमीन, भूखंड, तसेच नागरी सुविधेच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, आपण धरणाच्या उभारणी साठी मोठा त्याग केला. मात्र आपणास मोर्चे, आंदोलने, करण्यात आपल्या दोन पिढ्या गेल्या. त्यामुळेच मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने आपले प्रश्न सोडविणारी मोहीम हाती घेतली. पुढच्या १०-२० वर्षात सुटले नसते. ते साधारण ७०-८० टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत. कोविडमुळे काही काळ गेला आहे. सध्या जनगणना सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण झाल्यानंतर आपले स्वतंत्र ग्रामपंचायतचे प्रस्ताव मार्गी लावू. ज्या प्रकल्पग्रस्तांना क्षारपड जमीन आली आहे.त्या जमिनीतून जल संधारण खात्याच्या वतीने पाण्याचा निचरा करून दिला जाईल. आपले सर्व प्रश्न संपले असा आमचा दावा नाही.
आ.मानसिंगभाऊ नाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या चांदोली धरण उभारणीतून आपण गेल्या ३५ वर्षांपूर्वी विस्थापित झाला आहात. आपण आपले घर,जमीन,व सर्वस्वाचा त्याग केला आहे. खरेतर आपले प्रश्न तातडीने सुटायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. मात्र मंत्री पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतल्याने आपले इतक्या वर्षाचे प्रश्न मार्गी लागले असुन आपल्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा उमटल्या आहेत. आता शेवटच्या माणसाचे काम पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले, आम्ही जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना चे प्रश्न सोडविण्यासाठी २-३ महिने विशेष मोहीम राबविली. संबंधित सर्व खात्याच्या अधिकारी जिल्ह्यातील २९ वसाहतींना भेटी देवून त्यांचे प्रश्न समजून घेवून मार्गी लावले आहेत. यावेळी त्यांनी या मोहिमेत केलेल्या कामांची आकडेवारी मांडली.
यावेळी धरणग्रस्तांचे प्रतिनिधी नामदेव नांगरे फाळकेवाडी,धावजी अनुसे नेर्ले यांनी ना.जयंतराव पाटील,व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जे ४० वर्षात झाले नाही, ते करून दाखविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून काही प्रश्नांची मांडणी केली.