२५ एकरमध्ये ५० खंडी भात पिकवण्याचा उच्चांक
खेड / प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटांवर मात करून तालुक्यातील कुडोशी येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी भात पिकाचा कोकणात विक्रम करत आपल्या २५ एकर शेतीत जवळपास ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन उच्चांक निर्माण केला आहे. त्यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
कोकणातील शेती ही अत्यंत खर्चिक व शेतीसाठी माणसे न मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी,शेतीकडे दुर्लक्ष करीत असताना गेल्या ५ वर्षांपासून श्री सदानंद कदम हे कोकणात वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या शेती उत्पादनाचे उच्चांक निर्माण करून स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. २०२० हे वर्ष तसा देश विदेशातील अनेक संकटामुळे आर्थिकही अडचणींचा ठरला. मात्र, सदानंद कदम अग्रेसर ठरत त्यांनी कुडोशी व वेरळ येथील शेतात जवळपास २५ ते ३० एकर शेतीमध्ये ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन कोकणातील इतक्या मोठ्या प्रमाणात भात उत्पादन करणारा एकमेव शेतकरी म्हणून विक्रम केला आहे.