प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापलिकेच्या आगामी काळात होणाऱया निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढावे, अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष अनिल घाटगे यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे.
घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, महापलिकेच्या निवडणुकीत पूर्वी पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी फारसे कुणीही पुढे येत नसत. स्वर्गिय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पक्षीय राजकारण स्थापित व्हावे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांत महाकास आघाडीचा प्रयोग करत निवडणुका लढविल्या. त्यानंतर पक्षीय राजकारणाने बाळसे धरले. पुढे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे, पालकमंत्री सतेज पाटील यांनी आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. उमेदवारांना ताकद दिली. 2015 च्या महापालिका निवडणुकीत तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाकडून आर्थिक ताकद देण्यात आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या 2 ऐवजी 14 जागा निवडून आल्या. ताराराणी आघाडीचे 19 उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी 15, काँग्रेस 28, शिवसेना 4 यांनी एकत्रित येत भाजप-ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले.
आता पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडी करावी असा एक मतप्रवाह आहे. तर स्वतंत्र लढून निकालानंतर एकत्रित येऊन सत्ता स्थापन करावी, असा दुसरा मतप्रवाह आहे. महापालिकेच्या 81 प्रभागांचा अभ्यास करता असे 50 प्रभाग आहेत, की ज्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढू शकते तर उर्वरीत 31 प्रभागावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार तुल्यबळ आहेत, तेथे मैत्रिपूर्ण लढत होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीला 65 जागांवर विजय मिळू शकतो. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी विचार करून महाविकास आघाडीचा आदर्श राज्यापुढे ठेवावा, असेही घाटगे यांनी म्हटले आहे.