‘अनलॉक 5’ची नियमावली केंद्राकडून घोषित, नव्या सवलती नाहीत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने ‘अनलॉक 5’ ची नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरूच ठेवण्यात येणार आहे. तसेच इतर क्षेत्रांसाठी कोणत्याही नव्या सवलती देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या आहे तशीच परिस्थिती ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहविभागाने ही नियमावली प्रसिद्ध केली. ऑक्टोबरमधील सर्व अटींना 30 नोव्हेंबरपर्यंत कालावधीवाढ देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आता काहीसा कमी झाला असला तरी तो पूर्णतः नाहीसा झालेला नाही. तसेच सध्या सणासुदीचे दिवस आहेत. हिंवाळाही जवळ आला आहे. त्यामुळे या कालावधीत विषेश दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणून कोणत्याही नव्या सवलती देण्याचे टाळून अनलॉक 4 च्याच अटी पुढे चालू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या अनलॉकमध्ये दिलेल्या सवलती व राज्य सरकारांना दिलेले अधिकारही पुढे सुरू ठेवण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण विभागाने दिले आहे.
आचारसंहिता आहे तशीच
घराबाहेर जाताना मुखावरण (मास्क) चा उपयोग करणे, नाक व तोंड त्याने पूर्णपणे झाकणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे शारिरीक अंतर राखणे, हातांची स्वच्छता राखणे इत्यादी नियम पाळावेच लागणार आहेत. कारण ते न पाळल्यास संसर्गाचा उद्रेक पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना आता आहेत तेच नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
सवलतीही पुढे चालू
सप्टेंबर 30 ला घोषित करण्यात आलेल्या अनलॉक 4 च्या नियमावलीत राज्य सरकारांना शाळा, शिक्षण संस्था, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, प्रसाधनगृहे, खाद्यपेयगृहे इत्यादी सुरू करण्यासाठी अनुमती देण्यात आली होती. मात्र या सर्व ठिकाणी शारिरीक अंतराचा नियम पाळण्याचे बंधन घालण्यात आले होते. चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के उपस्थिती राखण्याचा नियम घालण्यात आला होता.
केंद्राची अनुमती आवश्यक
प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) वगळता इतर स्थानांवर लॉकडाऊन करायचा असेल तर राज्य सरकारांना केंद्र सरकारची अनुमती घेणे अनिवार्य करण्यात आले होते. हाच नियम आताही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य ठिकाणी म्हणजेच जिल्हा, शहर किंवा विभाग पातळीवर लॉकडाऊन स्वतःच्या इच्छेनुसार करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्देशांचे पालन राज्य सरकारांना करावे लागणार आहे.
100 दिवसांमधील नीचांक
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये भारतातील नव्या कोरोना रूग्णांची संख्या 36 हजार 370 आहे. हा गेल्या 100 दिवसांमधील नीचांक असून रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या कालावधीत 480 जणांचे मृत्यू या रोगाने झाले आहेत. हा सुद्धा 100 दिवसांमधील नीचांक आहे. याच 24 तासांमध्ये बरे झालेल्यांची संख्या 58 हजार 345 आहे. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण 90.62 टक्क्यांवर पोहचले आहे, अशी माहिती देण्यात आली.