स्वाभिमानी संघटना आक्रमक : पंचगंगा नदी प्रदूषणामुळे तेरवाडजवळ मासे मृत झाल्याने संताप
प्रतिनिधी / कुरुंदवाड
तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे. पाणी काळपट व दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही
प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱयावर कठडय़ाला दोरीने बांधून शासनाचा निषेध व्यक्त केला.
कोल्हापूर, इचलकरंजी व परिसरातील मैला व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीतील जलचर मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडल्यामुळे ते पाण्यात कुजत आहेत. यामुळे पाण्याला मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी नदीकाठावरील गावांना थेट पुरवठा होत असल्यामुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक आजारी पडत असल्याने मोठी चिंता निर्माण होत आहे. प्रदूषणाचा प्रश्न तर अनेक वर्षे प्रलंबित आहे. प्रदूषणाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालिघाटे व बंडू पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केल्याने मंगळवारी दुपारी तीन वाजता मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड बंधाऱयावर आले होते. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन अहवाल तयार केला. मात्र अहवाल समाधानकारक नसल्याने कार्यकर्त्यांनी हरबड यांना बंधाऱयावरील कठडय़ाला दोरीने बांधून शासनाचा निषेध केला. यावेळी बाबासाहेब भूजुगडे, रघु नाईक व संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.