प्रतिनिधी/ रत्नागिरी
शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कोरोनाच्या काळातही गरोदर मातांची आरोग्य सेवासत्रांद्वारे होणारी नियमित तपासणी याचा परिणाम म्हणून, रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्याच्या तुलनेत अर्भक मृत्यूचा दर अतिशय कमी आहे. त्यातही मागील 2 वर्षांची आकडेवारी पहाता आणखी कमी झाला असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे मोहिम राबवत आहे. त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्हय़ाचा अर्भक मृत्यूदर नियंत्रणात असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले आहे. पहिल्या खेपेच्या गरोदर मातांसाठी त्यांना आर्थिक लाभ देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरात होत आहे. तसेच कोरोनाच्या काळातही गरोदर मातांची आरोग्य सेवा सत्रांद्वारे होणारी नियमित तपासणी केली जात आहे.
याचा परिणाम रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्याच्या तुलनेत अर्भक मृत्यूचा दर अतिशय कमी आहे. भारताचा अर्भक मृत्यू दर हा 34 इतका असून महाराष्ट्र राज्यात तोच दर 19 इतका आहे. तर रत्नागिरी जिल्हयाचा मागील तीन वर्षाचा विचार करता तो 7 इतका कमी आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये विशेषतः ग्रामिण भागामध्ये आरोग्य सेवा सत्रांच्या माध्यमातून गरोदर मातांची 9 महिन्याच्या कालावधीत किमान चार वेळा तपासणी केली जाते. तपासणी दरम्यान रक्तवाढी साठी आयर्न फॉलीक ऍसिड तसेच पॅल्शियमच्या गोळया आवश्यकतेनुसार दिल्या जातात.तसेच प्रत्यक्ष तपासणी, धनुर्वात लसीकरण, आरोग्य शिक्षण व संदर्भ सेवा याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाते.
रत्नागिरी जिल्हयामध्ये दरमहा 1,083 इतकी आरोग्य सेवा सत्र घेतली जातात . चालू वर्षी माहे एप्रिल पासून सप्टेंबर 2020 अखेर 9648 इतक्या गरोदर मातांची नोंदणी आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत करण्यात आली आहे. वेळेवर नोंदणी झाल्यामुळे गरोदर मातेला त्याचा लाभ चांगल्याप्रकारे मिळू शकतो. नोंदणी झालेल्या सर्वच्या सर्व मातांना आयर्न फॉलिक ऍसिड तसेच पॅल्शियम च्या गोळयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच तपासणी दरम्यान संस्थेमध्ये प्रसुती करणे बाबत गरोदर मातांना वारंवार सुचित करणेत येते. जेणेकरुन प्रसूती सुखरुपपणे होण्यास मदत होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.