प्रतिनिधी/ रत्नागिरी
शासनाकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणातून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात अंगावर रॉकेल ओतून शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱया 50 वर्षीय नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न पेला. नागरिक व पोलिसांनी त्याला या प्रकारापासून तत्काळ रोखल्याने मोठा अनर्थ टळला. गुरूवारी दुपारी 1.15 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने प्रशासन मात्र हादरून गेले.
शैलेश सुर्वे (रा. गवळीवाडा) असे या नागरिकाचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात पोर्चमध्ये ही व्यक्ती फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. आजूबाजूला नागरिकांची वर्दळ असूनही त्यांने स्वतःला संपवण्याचा पवित्रा घेतला. बाटलीतून आणलेले रॉकेल अंगावर ओतून तो स्वतःला पेटवण्याच्या प्रयत्नात होता. ही बाब तेथे उपस्थित नागरिक व पोलीस कर्मचारी लतिका मोरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडील माचिस व कोणत्या तरी विषारी द्रव्याची बाटली व काही कागदपत्रे लगेचच काढून घेण्यात आली.
घडला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तत्काळ अन्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया शैलेश सुर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आपणाला शासनाकडून न्याय मिळत नसल्याचे त्याचे म्हणणे होते. रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे असलेल्या सामायिक जमीनीबाबत प्रशासनाकडे कार्यवाही प्रलंबित असल्याचे शैलेश सांगत होता. पण प्रशासनाकडे कुठलाच अर्ज आलेला नसल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. त्याच्या कुटुंबियांना या प्रकाराची कल्पना पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.