शिक्षण, त्यातही उच्च शिक्षण ही सध्याच्या काळातील अत्यावश्यक बाब बनली आहे. तथापि, असे शिक्षण अत्यंत खर्चिक असते. त्यामुळे बुद्धी आणि इच्छा असूनही अनेकांना आर्थिक ओढगस्तीमुळे उच्च शिक्षण तर सोडाच, पण पायाभूत शिक्षणापासूनही वंचित रहावे लागते. झारखंडमधील सिंदरी येथे असलेल्या बीआयटी या शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्याचा एक स्तुत्य प्रयत्न चालविला आहे. या विद्यार्थ्यांनीच ‘प्रयास इंडिया’ नामक एक संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य पायाभूत शिक्षण दिले जाते. बालवाडी ते बारावी पर्यंतचे शिक्षण या संस्थेकडून दिले जाते.
गजेंद्र महातो यांच्या कल्पकतेतून ही संस्था साकारली आहे. या संस्थेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी 10 वी 12 च्या सरकारी परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. सध्या या संस्थेच्या चार शाखा आहेत. या चार शाखांमधून 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी गरीब वर्गातील असून ज्यांना आर्थिक कारणांस्तव शिक्षण घेणे अशक्य आहे, अशांनाच या शाखांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यांना शिक्षण तर विनामूल्य दिले जातेच, पण शिक्षणासाठी लागणारी सामग्रीही देण्याची व्यवस्था करण्यात येते. लोकांनी दिलेल्या देणग्यांवर ही संस्था चालले. स्वतः जे शिकत आहेत, त्यांनीच गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची संवेदनशीलता दाखवावी ही बाब महत्वाची असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 2008 मध्ये प्रयास इंडियाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजवर अव्याहतपणे ही संस्था ज्ञानदानाचे हे सामाजिक कार्य करते.
सिंदरीच्या बीआयटीमधील अंतिम वर्षातील विद्यार्थी या गरीब मुलांना शिकविण्याचे उत्तरदायित्व स्वीकारतात. स्वतःचा अभ्यास सांभाळून ते हे कार्य करतात हे विशेष प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.