प्रतिनिधी/ तततत
राज्यातील जिरायत जमीनी बागायत करणेकामी शेतकर्यानी बोअर मारल्या आहेत, विहीरी खुदाई केलेल्या आहेत तसेच विहीर व नदीपासून आपापल्या शेतापर्यंत पाईपलाईनची कामे करून मोटर पंच व स्टार्टर पॅनल बोर्ड बँकांची कर्जे काढून खरेदी केलेली आहेत .
महावितरणकडे नवीन वीज कनेक्श्नसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून वीज कनेक्शनची मागणी करून महावितरणच्या नियमानुसार डिपॉझीट रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. गेली चार पाच वर्षांपूर्वीपासून वीज कनेक्शन प्रलंबित आहेत बँकांच्या कर्जाचे व्याज चालू आहे. बँका आपल्या कर्ज वसूलीसाठी शेतकर्यांकडे तगादा लावत आहेत. याबाबत अनेक शेतकर्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेवून मी राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.डॉ.नितीन राऊत यांचेकडे कृषी पंप ग्राहकांची प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने जोडणी करण्यात यावीत, यासाठी प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करून मागणी केलेली होती. त्याचबरोबर भाजपा सरकारने शेतकर्यांच्या माथी मारलेली प्रति कनेक्शन स्वतंत्र ट्रान्सफार्मर ( एच.व्ही.डी.एस. ) योजना रद्द करून पारंपारीक पद्धतीने व मागणीनुसार सौर उर्जेद्वारे नवीन वीज कनेक्शन जोडणी करणेबाबतची वस्तुस्थिती मा.ऊर्जा मंत्री यांच्या निदर्शनास आणुन दिलेली होती . त्यास सकारात्मक प्रतिसाद देवून मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी शेतकर्यांना क्रमवारीनुसार प्रलंबित वीज कनेक्शन जोडणी करणेबाबतचा आदेश महाविकास आघाडी सरकारने नुकताच निर्गमित केला असून , परिणामी राज्यातील लाखो कृषी पंप ग्राहकांना वीज कनेक्शन मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .