रयतमधील 40 कोटींच्या भ्रष्टाचाराचा सोशल मिडियावर धुमाकूळ
प्रतिनिधी/ सातारा
दीन दुबळे, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱया रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाला भ्रष्टाचाराची बांडगुळे लागली आहेत. अध्यक्षांनी ती नुसती छाटली मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर खटले चालले पाहिजेत. फक्त राजीनामा नको, भ्रष्टाचाराच्या गटारात अडकलेल्या बांडगुळांवर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करा, अशी मागणी रयतच्या कर्मचाऱयांमधून होवू लागलीय. बांडगुळे लागण्यापूर्वीच अध्यक्ष आणि मॅनेजिंग कौन्सीलच्या सदस्यांनी दुर्लक्ष केल्याने भरती प्रक्रियेचा महाघोटाळा झाल्याची खदखत रयत सेवकांनी व्यक्त केली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सिनीअर कॉलेजच्या रसायन शास्त्र विषयाच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेत दोन माजी सचिवांनी आपल्या विश्वासू नेटवर्कमधून कोटय़ावधी जीबीची कमाई केली आहे. यात कराळे आणि बुरुंगले हे दोघे मुख्य सुत्रधार असून तेराजणांची टीम त्यांच्या नियंत्रणाखाली काही महिने काम करत होती. हे संस्थेतील काही सेवकांनी अध्यक्षांसह पदाधिकाऱयांना पत्रव्यहारातून इंत्यभूत माहिती दिली. 15 लाख ते 35 लाख घेतले गेल्याचा आरोप या पत्रात केला होता. 15 लाखाला 15 जीबी, 20 लाखाला 20 जीबी, 30 लाखाला 30 जीबी असे मेसेज भरती प्रक्रियेत पडकलेल्या सावजाला मोबाईलवर पाठवले गेले.
पैसे घेण्यासाठी प्रा. डॉ. हेमंत आकोलेकर, प्रा. डॉ. श्रीमती राधवणे(कोपरगाव) यांच्या नेतृत्वाखाली वसुलीच्या टोळीत उच्चविद्याविभुषित श्रीमती दरेकर, श्रीमती यडायत, प्रा. कुंदे (अहमदनगर), प्रा. स्वप्नील बनकर, प्रा. भांगारे (लोणंद), प्रा. उंडे, प्रा. नलगे, प्रा. दिनेश ससाण (श्रीगोंदा), प्रा. कुलभूषण ससाणे, प्रा. संतोष क्षीरसागर (कर्जत), प्रा. किरण ढवळे, श्रीमती किर्ती अमोलिक (श्रीरामपूर) ही मंडळी सक्रीय असल्याची आरोपात पत्रकात केला आहे. ही एका विषयाची वसुली टोळी तर अन्य विषयाची टोळी उजेडात आणली गेलेली नाही. कराळे, बुरुंगले यांनी संस्थेशी प्रामाणिक असल्याचा नेहमीच रुबाब दाखवला असून सचिव पदावर असताना करोडो रुपयांची माया गोळा केल्याचा संशय रयत सेवक व्यक्त करु लागले आहेत.