प्रशासकीय अधिकारी मैत्रेय कुलकर्णी यांचे मत : मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ‘नव्या वाटा, नवी क्षितिजे’ संवाद शृंखला सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
प्रशासकीय सेवेमध्ये बेळगावच्या तरुणाईचा सहभाग खूप कमी दिसतो. बेळगाव नजीकच असणारे कोल्हापूर, पुणे, दिल्ली येथील तरुणाई प्रशासकीय सेवेचा आवर्जून विचार करत या क्षेत्राची निवड करत आहेत. त्या तुलनेत काही अंशी बेळगाव मागे असून बेळगावच्या तरुणांनी हे क्षेत्र जरूर निवडले पाहिजे. एक नागरिक म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून देशासाठी खूप काही करण्याची संधी हे क्षेत्र आपल्याला देते. याचा बेळगावच्या तरुणाईने विचार करावा, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी मैत्रेय कुलकर्णी यांनी केले.
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ‘नव्या वाटा, नवी क्षितिजे’ ही संवाद शृंखला सुरू करण्यात आली आहे. यातील पहिले शिलेदार बेळगावचे सुपुत्र असणारे मैत्रेय कुलकर्णी हे होते. ते सध्या फस्ट सेपेटरी, ऍम्बसी ऑफ इंडिया टू अर्जेंटीना, पॅराग्वे व उरूग्वे या पदावर कार्यरत आहेत. मंथनतर्फे गुगल मीटद्वारे थेट अर्जेंटीनाहून त्यांनी रसिकांशी संवाद साधला, वैभव लोकूर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी प्रशासकीय सेवेत बेळगावचा सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले मी मुळचा बेळगावचा. शालेय शिक्षण एम. व्ही. हेरवाडकर शाळेत झाले. पुढे जीआयटीमधून पदवी घेतली. बेळगावच्या शिक्षणामध्ये कोठेही कृत्रिमता नाही. शिवाय अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रमांना या शाळांनी सतत प्रोत्साहन दिले. माध्यमिक शाळेत वृत्तपत्र वाचत असताना भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय वाचायची आवड लागली. आणि आपण हे क्षेत्र निवडण्याचे ठरविले.
प्रशासकीय परीक्षा ही कठीण असते. त्यामध्ये खूप अनिश्चितता असते. परंतु अशक्मय नसते. फक्त प्रयत्न करण्यात कसूर करून चालणार नाही. आपला आत्मविश्वास गमावून चालणार नाही. परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया दोन्ही आपल्या चिकाटीची, जिद्दीची सत्वपरीक्षाच पाहत असतात. त्याची तयारी खूप करावी लागते. अंतिम मुलाखतीवेळी धमाल प्रश्न विचारले जातात. तुमच्या ज्ञानाबरोबरच हजर जबाबीपणा, निरीक्षण यावरसुद्धा लक्ष केंद्रित केले जाते. या सर्वाची मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या मुलाखतीत मैत्रेय यांनी, या परीक्षांची तयारी, प्रत्यक्ष परीक्षा, मुलाखतीचे स्वरूप अशा सर्व प्रक्रियांवर विस्तृत माहिती दिली. भारताचे इतर देशांसमवेत असणाऱया संबंधावरही त्यांनी भाष्य केले. आयएफएस (इंडियन फॉरेन सर्व्हिस) हे क्षेत्र आपण कसे निवडले आणि इथपर्यंत कसे पोहोचलो. याची माहिती दिली.
तुमच्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती किंवा तुमचे आयडॉल कोण? या प्रश्नावर अशी कोणतीही व्यक्ती माझा आदर्श नाही. प्रत्येक व्यक्तीकडून आपण त्याच्यातील काही चांगले घेत असतो. परंतु एकाच व्यक्तीला आदर्श मानल्यास त्याचेच अनुकरण करू लागतो. त्यामुळे माझ्य व्यक्तिमत्त्वाचे पैलू पूर्णत: विकसित होतीलच असे नाही. माझ्यावर प्रभाव माझ्या कुटुंबीयांचा व विशेषत: आईचा आहे. अनेक अभावांशी सामना करत तिने जी वाटचाल केली त्यानेच मी प्रभावीत झालो आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्जेंटीनामध्ये काम करत छंद जोपासतो. परंतु आता छंदांचे सुद्धा डिजिटायझेशन झाले आहे. कॅसिनोवर सूर वाजवतो, काहीवेळा फुटबॉल खेळतो, वाचन करतो. अर्जेंटीनामध्ये योग करणारे सर्वाधिक लोक आहेत. भारतीय संस्कृतीचे त्यांना कमालीचे आकर्षण आहे. भारतीय संस्कृतीचा प्रसार करतानाच भारताचे अन्य देशांशी असणारे संबंध याकडेही लक्ष ठेवणे आवश्यक असते. आपल्या देशाबद्दलचा आदरभाव वाढवत राहणे, हे आपले कर्तव्य आहे, असे मी समजतो, असे मैत्रेय म्हणाले.
प्रारंभी मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम दादासाहेब गळतगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केला होता. प्रशासकीय सेवेमध्ये बेळगावची तरुणाई
फारशी रस घेताना दिसत नाही!
बेळगावच्या तरुणाईला काय सांगाल? या प्रश्नावर प्रशासकीय सेवेमध्ये बेळगावची तरुणाई फारशी रस घेताना दिसत नाही. त्या तुलनेत अन्य शहरातील तरुणाई या क्षेत्राकडे वळत आहे. तेव्हा बेळगावने याचा विचार करावा. ही परीक्षा कठीण आहे. तुम्ही अभ्यास करत असताना इतर तरुण अर्थार्जन करतात. तेव्हा तुम्ही संभ्रमात पडता. अशावेळी आपली स्वत:चीच आपण परीक्षा घ्यावी. वेळ, ऊर्जा यामध्ये आपण सक्षम आहोत का? याचे उत्तर तुमचे अंतर्मन देईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि तो वाढला की कठोर परिश्रमासाठी तुम्ही सज्ज होऊ शकता, असे सांगून त्यांनी समारोप केला.