प्रतिनिधी/ कराड
महापूर ओसरल्यानंतर येथील नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. कृष्णा घाट आणि प्रीतिसंगम बागेत सोमवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात सुमारे 100 पालिका कर्मचाऱयांनी भाग घेतला. स्वच्छतेचे काम अजूनही अपूर्ण असून ते मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
महापूर ओसरल्यानंतर पालिकेने सर्वप्रथम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाची स्वच्छता मोहीम राबवली होती. सुदैवाने समाधीस्थळाचे काहीही नुकसान झालेले नाही. आज सोमवारी कृष्णा घाटावरील रस्ता आणि प्रीतिसंगम बागेतील पाथ वेसह लॉनवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. घाटावरील रस्त्यावर गाळ मोठय़ा प्रमाणात साचलेला होता. हा गाळ काढून स्वच्छता करण्यात आली. बागेतील सर्व पाथ वेवर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. बागेतील ध्वनीयंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आज मोहीम अपूर्ण राहिली. ती उद्या सोमवारी राबवण्यात येणार आहे. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, गटनेते सौरभ पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, जयंत बेडेकर, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे उपस्थित होते. गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनीही पाहणी केली. बांधकाम, आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. पाणी साचल्यामुळे प्रीतिसंगम बागेसमोरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मंगळवारी प्रीतिसंगम बागेसह कोयनेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.