क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीतील अखेरच्या स्थानासाठी एफसी गोवा -हैदराबाद एफसी यांच्यात निर्णायक लढत होईल, फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर आज विजयी होणारा संघ बाद फेरीत प्रवेश करेल.
19 लढती झाल्यानंतर या 90 मिनिटांतील कामगिरीने दोन्ही संघांचे भवितव्य नक्की होईल. एफसी गोवाचे पारडे जड असून बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना एकाच गुणाची गरज आहे. गोव्याचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांनी मात्र आपला संघ एक गुणासाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक सामन्यात तुमच्यावर दडपण असते. आमच्या क्लबची मानसिकता प्रत्येक सामन्यात निर्णायक विजयाचे तीन गुण मिळविण्याची आहे. आम्हाला अर्थातच हैदराबादविरूद्ध तीन गुण हवे आहेत, याचे कारण आमची मानसिकता उच्च आहे, असे फरांडो म्हणाले. गोव्याचा संघ सर्वाधिक दरारा असल्यापैकी आहे. आक्रमणातील ताकदीमुळे त्यांना महत्वाचे गुण मिळाले आहेत, पण बचावफळीची क्षमता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यांना 23 गोल पत्करावे लागले आहेत.
एफसी गोव्याचा संघ गेल्या 12 सामन्यांत अपराजित आहे. गोल करणे ही फरांडो यांच्या संघासाठी काही समस्या ठरलेली नाही. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात गोल करण्यासाठी जणू काही सवयच त्यांना जडली आहे आणि त्यामुळे त्यांनी महत्वाचे गुण मिळविले आहेत. फरांडो यांना हीच योजना कायम ठेवण्याची आशा आहे.
आम्ही आक्रमक स्थितीत खेळू, कारण आम्हाला जिंकायचे आहे. आमची योजना सारखीच असेल. एक गोलाच्या फरकाने जिंकणार असून तर आमची मानसिकता दुसरा गोल नोंदविण्याची असेल. प्रतिस्पर्ध्याने गोल केला तर आम्ही गोल करून बरोबरी साधतो आणि मग दुसरा गोल करतो. मी आनंदात असून या मानसिकतेच्या जोरावर या संघाच्या कामगिरीत सुधारणा करणे शक्य होते, असे फरांडो म्हणाले.
हैदराबाद एफसीला आव्हान कायम ठेवण्यासाठी निर्णायक विजय अटळ आहे. त्यामुळे त्यांना सर्व ताकद पणास लावावी लागेल. प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ यांना नॉर्थईस्ट युनायटेड संघाकडून कृपेची अपेक्षा होती, पण त्या संघाने केरळ ब्लास्टर्सला आरामात हरविले. हा लढत बाद फेरीसारखीच आहे, कारण जिंकलेल्या संघासाठी स्पर्धा पुढे सुरू राहील. ही जवळपास अंतिम फेरीच आहे, असे मार्क्वेझ म्हणाले.