ऑनलाईन टीम / नगर :
भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 च्यावर जागा मिळतील, मी पुन्हा येईन, महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही, अशी भविष्यवाणी करणारे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा. त्यांची सर्वच्या सर्व भाकिते फेल होत आहेत, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
तसेच नगर जिह्याचे स्थानिक पालकमंत्रिपद मिळाले नाही म्हणून आपण नाराज नसून, पालकमंत्री पद नाकारण्यामागे पक्षाने तरूणांना ही जबाबदारी द्यावी, हाच हेतू असल्याचा निर्वाळा देखील थोरात यांनी दिला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्री थोरात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, विरोध करणे हाच एकमात्र विरोधकांचा पिंड आहे. भाजपने आयारामांच्या झुंडीच्या झुंडी पक्षात घेतल्या. त्याचेच फळ म्हणून जिल्हाध्यक्ष निवडीवरून सध्या राज्यात भाजपमध्ये हाणामारी सुरू आहे, यानिमित्ताने भाजपच्या अधोगतीला सुरवात झाली आहे. जेएनयू संदर्भात प्रतिक्रिया देत ते म्हणाले, जवाहर नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी पुरोगामी विचारांचे आहेत. या विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. हा घटनेचा आपण निषेध करतो. नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ नये, या मताशी आम्ही ठाम आहोत. थोरात यांच्याकडे कोल्हापूर पालकमंत्री पदाची जबाबदारी घोषित करण्यात आली.
मात्र, त्यांनी पालकमंत्री पद नाकारले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता थोरात म्हणाले, आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहोत. राज्याचे महसूलमंत्रीपद आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद आपणास नको आहे. यामागे आपण नाराज असल्याच्या चर्चा निरर्थक आहेत.