विधानपरिषदमध्ये गोंधळ, पोलीस आयुक्तांवर कारवाई करा
प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषद विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी पोलिसांनी आपणाला अडविले, हा संपूर्ण सभागृहाचा अवमान आहे. तेव्हा सरकारने याबाबत गांभीर्याने घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात करत असताना अचानक फलोत्पादन मंत्री नारायण गौडा यांनी उठून उद्धटपणे बोलले. यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा धरणे आंदोलन छेडले. जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर सभापती बसवराज होरट्टी यांनी मंत्री नारायणगौडा यांना यापुढे अशाप्रकारे बोलू नका, ही शेवटची ताकीद आहे, असे सुनावले.
काँग्रेसच्यावतीने सुवर्णसौधवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येत होता. मोर्चा काढून झाल्यानंतर ट्रक्टरमधूनच आम्ही विधानसभेकडे येत असताना पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आणि पोलीस अधिकारी सतीशकुमार यांनी मला अडविले. तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ते करत होते. त्याचवेळी फलोत्पादन मंत्र्यांनी अचानक ट्रक्टरमधून दररोजच या, असे सांगितले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी एकेरी शब्दात बाचाबाची झाल्याने बराच उशीर गोंधळ उडाला.
एस. आर. पाटील म्हणाले, हा केवळ माझा अवमान नाही तर सभापतींचा अवमान आहे. तेव्हा संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. ट्रक्टरवरून आलो म्हणून आम्हाला आत घेतले जात नाही. ही बाब योग्य नाही, असे सांगत संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
प्रकरण हक्कभंग समितीकडे…
यावर सभापती बसवराज होरट्टी यांनी तुमच्या या तक्रारीची नोंद करून घेतली असून हे प्रकरण हक्कभंग समितीकडे वर्ग केले जाईल, असे ठोस आश्वासन दिले. काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सभापतींनीही हा निर्णय घेऊन याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.