विधानपरिषदेत ग्रामीण विकास-पंचायतराज मंत्री ईश्वराप्पा यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकमध्ये जलशक्ती योजना राबविली जात आहे. याचबरोबर केंद्र सरकारने घर घर गंगा ही योजना लागू केल्यानंतर कर्नाटकमध्ये सर्वात जास्त यशस्वीपणे ही योजना राबविली असल्याचे ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी विधानपरिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्ष सदस्यांनी शुद्ध पाण्याचा पुरवठा अजूनही काही गावांना होत नाही. तेव्हा शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
राज्यातील 56 लाख घरांना आतापर्यंत नळजोडणी झाली आहे. मध्यंतरी कोरोनामुळे कामे स्थगित झाली होती. मात्र पुन्हा ही कामे सुरू करण्यात आली असून 2021-22 मध्ये 25 लाख घरांना नळजोडणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या दररोज 10 हजार घरांना आम्ही नळजोडणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
काही गावांमध्ये अजूनही कुपनलिकांचे पाणी सर्वसामान्य जनतेला प्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. दूषित पाण्यामुळे दात दुखणे, पोट दुखणे असे विकार वाढत आहेत. तेव्हा तातडीने पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषद सदस्य एन. रवीकुमार यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये पाणीपुरवठय़ाची योजना यशस्वी झाल्याची नोंद झाली आहे. प्रत्येक घरामध्ये नळजोडणी करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. बरीच कामे प्रगतिपथावर आहेत. ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणी नदीचे पाणी पुरवठा होत आहे. तर ज्या ठिकाणी विहिरी आहेत त्या विहिरींचे पाणी पुरविण्याकडे भर देण्यात येत आहे. याचबरोबर विविध जलाशये यामधूनही पाणी देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे के. एस. ईश्वराप्पा यांनी सांगितले.